अहमदनगर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सत्कार
दिल्लीत लाडू वाटून आनंद साजरा
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांचा तिसऱ्यांदा समावेश झाल्याने त्यांनी मंगळवारी (दि.11 जून) दिल्ली येथील शास्त्री भवन येथे समाज कल्याण मंत्रालयाच्या कार्यालयात केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री पदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव विजय वाकचौरे व जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी ना. आठवले यांचा सत्कार केला. यावेळी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विश्वासाने पुन्हा मंत्रीपदाची संधी दिली आहे. माझ्या उपेक्षित समाजासाठी व त्यांच्या कल्याणासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी यांच्या कल्याणासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.
उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संविधानला कुणीही बदलू शकत नाही, ही रामदास आठवलेची गॅरंटी असल्याचे स्पष्ट करुन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाला देशात बळकट करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
