भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मतदारांचे आभार व महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणुकीत मताधिक्याने निवडून आले. या निवडणुकीतून जनशक्तीचा विजय झाला असून, विखे फॅक्टरचा फुगा फुटल्याची भावना कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी व्यक्त केली. तर दोन्ही नवनिर्वाचित खासदारांचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांनी अभिनंदन केले.

कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीला राज्यभर सक्रिय पाठिंबा दिला होता. अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तन, मन, धनाने महाविकास आघाडीच्या (इंडिया आघाडी) उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होते. कम्युनिस्ट पक्षाने निवडणूकी पूर्वी भाजप हटाव देश बचाव! जनजागरण मोहीम राबवली होती. जिल्ह्यातही पदयात्रा व गावोगावी सभा घेऊन भाजपच्या जनविरोधी, लोकशाही विरोधी धोरणाचा पर्दाफाश केला होता. सर्वसामान्य जनतेने मोदी व राज्यातील शिंदे, फडणवीस, पवार सरकारच्या केवळ घोषणाबाजीला आणि फोडाफोडीच्या राजकारणाला नाकारले असून, मतपेटीतून महायुती विरूद्ध कौल दिला असल्याचे कॉ. ॲड. लांडे यांनी म्हंटले आहे.
शेतकरी, कामगार गृहिणी यांना महागाई व बेकारीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. या सरकारच्या काळात मोठ्या उद्योगपतींना व ठेकेदारांना सवलती व सामान्य जनता आणि विरोधकांना प्रचंड त्रास झाला आहे. यामुळे राज्यात व जिल्ह्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकीतून धन शक्ती, हुकुमशाही व दहशतीच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही, हे सर्वसामान्य जनता व गावोगावच्या सामान्य कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. या निवडणुकीच्या भारतीय संविधान वाचवण्यासाठी मोदी आणि भाजप पराभव करण्यासाठी मोठा मुद्दा होता, असे लांडे यांनी म्हंटले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉ.ॲड. बन्सी सातपुते, सहसेक्रेटरी कॉ. ॲड सुधीर टोकेकर, कॉ. संतोष खोडदे व कॉ. संजय नांगरे यांनी मतदारांचे आभार मानले आहे.
