निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची गरज -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रारंभी नवनाथ विद्यालयात गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, सुवर्णा जाधव, अमोल वाबळे, भानुदास लंगोटे, प्रमोद थिटे, तेजस केदारी, राम जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, वाचनालयाचे उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे, सचिव मंदाताई डोंगरे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ भारताचा संदेश दिला. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी सार्वजनिक स्वच्छता ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून, नागरिकांचे देखील कर्तव्य आहे. युवकांसह नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छतेला चळवळीचे स्वरुप दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सार्वजनिक स्वच्छता ही एका दिवसा पुरती मर्यादित न ठेवता दररोज नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची गरज असून, स्वच्छ व सुंदर भारत घडविण्यासाठी नागरिकांनी योगदान देण्याची गरज आहे. परिसर स्वच्छ असल्यास साथीचे आजार न पसरता नागरिकांचे आरोग्य चांगले राहते. संत गाडगे महाराजांनी काळाची गरज ओळखून सार्वजनिक स्वच्छतेसाठी कार्य केले होते. त्यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.