फुले दांम्पत्यांनी यातना भोगून स्त्रिया व शोषितांचा उध्दार करुन परिवर्तन घडविले -एन.एम. पवळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 133 व्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, राज्य उपाध्यक्ष वसंतराव थोरात, कार्याध्यक्ष शाम गोडळकर, उपमहासचिव सुहास धीवर, योगेश साठे, प्रविण ओरे, रामभाऊ सकट, विश्वजित गायकवाड आदी उपस्थित होते.
एन.एम. पवळे म्हणाले की, समाजाच्या उध्दारासाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतलेले फुले दाम्पत्याचे स्थान इतिहासात कायम अग्रणी राहील. तथाकथित उच्चवर्णीय समाजाकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून व गुलामगिरीतून बहुजन समाजाला बाहेर काढण्यासाठी तसेच स्त्री वर्गाची मुक्तता व त्यांना हक्काची जाणीव करून देण्याचे महान कार्य त्यांनी केले. स्त्री शिक्षणाबद्दल शब्दही काढणे पाप मानले जात असताना त्या काळात त्यांनी सावित्रीबाईंच्या माध्यमातून स्त्रियांसाठी शाळा काढली. स्वत: यातना भोगून स्त्रिया व शोषित वर्गाचा उध्दार करुन, त्यांनी परिवर्तन घडविले, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष के.के. जाधव यांनी समाजात विषमता आणि रुढी, परंपरा दूर होण्यासाठी महात्मा फुले यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. शिक्षणाने बहुजन समाजाला जागरुक करण्याचे काम त्यांनी केले. महिलांना सुशिक्षित करुन त्यांनी समाजाला दिशा देण्याचा दृष्टीकोन साध्य केला. त्यांचे कार्य व विचार समाजाला प्रेरणा व ऊर्जा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.