• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

बहुजन समाज पार्टीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

ByMirror

Aug 1, 2023

तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर संभाजी भिडे यांचा निषेध करुन अटक करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती विविध ठिकाणी साजरी करुन, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन त्यांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांना सात दिवसात अटक करण्याची मागणी करण्यात आली.


बहुजन समाज पार्टीच्या वतीने सिद्धार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चोभे कॉलनी) बोल्हेगाव येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. तर महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, साईबाबा, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल वादग्रस्त व चुकीचे वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदवून अटक करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, माजी जिल्हाध्यक्ष मेजर राजू शिंदे, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, गणेश बागल, रामचंद्र पवार, रवी कुमार, आकाश अल्हाट, बाळासाहेब कांबळे, अतुल काते, हरीश परवाले, हर्षद उजागरे, मयूर शिंदे, संजय डहाणे, संजय साळवे, दीपक साळवे, सुप्रिया शिंदे, भाऊसाहेब बोरुडे, मोहन काळे, सलीम अख्तर आदी उपस्थित होते.


देशाला सामाजिक क्रांतीची दिशा दाखवण्याचे कार्य महाराष्ट्रातील महापुरुषांनी केले आहे. सर्व समाजाला प्रेरणा देणारे महापुरुषांबद्दल संभाजी भिडे आक्षेवार्ह वक्तव्य करत आहे. बौद्धिक दिवाळखोरीने ग्रस्त असलेल्या या तथाकथितांकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान केला जात आहे. समाजात दुही निर्माण करणाऱ्या या समाजकंटाकांना राज्य सरकार मोकाट सोडत आहे. राजकीय हित जोपसण्यासाठी त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. राज्य सरकारचे अभय असल्याने भिडे आणखी बिनधास्त असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.


देशात अनेक महत्त्वाचे मुद्दे असताना या मुद्दयांना बगल देण्यासाठी व लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भिडे यांच्या रुपाने वादग्रस्त वक्तव्य समाजा समोर आनले जात आहे. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी वेळीच कारवाई होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करुन भिडे यांना अटक करण्याची मागणी बसपाच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रमुख मागणीसाठी 3 ऑगस्ट रोजी राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *