अभिजीत खोसे यांचा आरोप; खासदारांच्या साखर वाटपाने गुरु चेल्याची साखर वाढली
गलिच्छ राजकारणाने शहराचे वातावरण बिघडविण्याचे काम सुरु -अभिजीत खोसे
अहमदनगर (प्रतिनिधी)- वकिलावर हल्ला केल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर निशाना साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी काळे व त्यांचे नेते असलेले माजी महसूलमंत्री यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप केला आहे. तर खासदारांच्या साखर वाटपाने गुरु चेल्याची साखर वाढल्याचे असून, त्यांच्या गलिच्छ राजकारणाने शहराचे वातावरण बिघडत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नुकतेच शहरातील ॲड. हर्षद चावला यांच्यावर हल्ला झाला होता. काळे व खोसे यांच्या आरोप प्रत्यारोपानंतर खोसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काळे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी उपस्थित होते.
त्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अडकविण्याची गरज काय? त्यांची पात्रता काय? म्हणून त्यांच्या विरोधात षडयंत्र केले जाणार असल्याचा प्रश्न खोसे यांनी उपस्थित केला. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षाची निवड करुन शहरात काँग्रेस संपविण्याचे षडयंत्र केले. त्या पदाधिकाऱ्याने शहरात उरली-सुरली काँग्रेस संपविण्याचे काम सुरु केले आहे. शहराचा कळवळा दाखविणाऱ्या माजी महसूल मंत्री यांनी शहरासाठी काय योगदान दिले? कोणते विकासात्मक कामे त्यांनी केली. नगरकरांना एकही त्यांचे काम आठवणार नाही. शहराच्या युवकांच्या रोजगार निर्मितीसाठी काय योगदान दिले? असल्याचा प्रश्न त्यांनी मांडला आहे.
डोक्यावर परिणाम झाल्याप्रमाणे तो काँग्रेसचा पदाधिकारी शहरात वागत असून, विकासात्मक कामांना खोडा घालून प्रसिद्धी मिळवण्याचे काम करत आहे. त्या पदाधिकारी बरोबर माजी महसूल मंत्री यांच्या देखील डोक्यावर परिणाम झालेला असल्याचे खोसे यांनी सांगितले.
काँग्रेसचा तो पदाधिकारी रोजगार निर्मितीची भाषा करतो. मात्र तो स्वतः बेरोजगार असून, रोजगाराचे साधन म्हणून त्याने राजकारणाची निवड केली आहे. विविध शासकीय कार्यालयात जाऊन अर्ज, निवेदन देऊन अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून त्याचे उदरनिर्वाह सुरु आहे. अनेक वर्षापासून त्याचे प्रताप सुरू आहे. एखाद्या राजकीय पुढाऱ्याने खाजगी कार्यक्रम घेतल्यास त्याच्या पोटात दुखते. खासदारांनी शहरात सुरु केलेल्या साखर वाटपाने तो पदाधिकारी व त्याच्या नेत्याची शुगर मात्र नक्की वाढली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
