आंबेकर, अंदानी, आढाव, ॲड. तोडकर, साळवे, तन्वर ठरले पुरस्काराचे मानकरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमीच्या वतीने सावित्री ज्योती गौरव पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आले असून, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे गणेश आंबेकर, सीए शंकर अंदानी, दिलीप आढाव, ह.भ.प. ॲड. सुनील तोडकर, विनोद साळवे व विद्या तन्वर यांचा सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे.
सावेडी, गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सावित्री ज्योती महोत्सवात 11 जानेवारीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुहास सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे व पुरस्कार निवड समितीचे प्रमुख पोपट बनकर यांनी दिली.
सीए असलेले शंकर अंदानी आर्थिक क्षेत्रात योगदान देत असताना अनेक सामाजिक संस्था व धार्मिक स्थळांचे मोफत ऑडिट करुन त्यांना मार्गदर्शन करत असतात त्यांना जीवन गौरव, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गणेश आंबेकर, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत दिलीप आढाव, कायदेविषयक जनजागृती त्याचबरोबर अध्यात्म क्षेत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे ह.भ.प. सुनील तोडकर, सामाजिक कार्यात सतत सहभागी असणारे युवा उद्योजक विनोद साळवे आणि महिला सक्षमीकरणासह कॅन्सरची जागृती करणाऱ्या विद्या तन्वर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याचे जय युवा अकॅडमीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.