शासनकर्ती जमात बनण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला उपदेश अंगीकारण्याची गरज -संजय सपकाळ
नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिंगार छावणी परिषदेच्या हॉस्पिटल मधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बाबासाहेबांच्या पुतळ्या समोर मेणबत्त्या प्रज्वलीत करुन त्रिशरण, पंचशील व भीम स्तुतीने त्यांना वंदन करण्यात आले.
धम्ममित्र संजय भिंगारदिवे यांनी त्रिशरण, पंचशीलने वंदना दिली. यावेळी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, संजय भिंगारदिवे, सचिन चोपडा, चुन्नीलाल झंवर, रतनशेठ मेहेत्रे, सर्वेश सपकाळ, सुधीर कपाले, अशोक पराते, अभिजीत सपकाळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, अशोक दळवी, शेषराव पालवे, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, जालिंदर बेरड, जेव्हिअर भिंगारदिवे, अशोक (बाबूजी) भिंगारदिवे, सुनील बग्गन, भरत कनोजिया, जहीर सय्यद आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, दीन-दलितांना न्याय, हक्क मिळवून देऊन, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी आपले जीवन वाहिले. त्यांचे कार्य सर्व समाजाला दिशा देणारे आहे. माणसा-माणसात भेद करणारे विचार संपविल्यास एक आदर्श समाजाची निर्मिती होणार आहे.
देशाची शासनकर्ती जमात बनण्यासाठी बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करण्याचा उपदेश अंगीकारण्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे विचार अवलंबण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.