बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांसह बाबासाहेबांच्या विचारांचा जागर
आजही वंचित व दुर्बल घटकांना बाबासाहेबांच्या विचाराने आधार देण्याची गरज -विवेक भिंगारदिवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक उपक्रमाने अभिवादन करण्यात आले. प्रारंभी सकाळी मार्केटयार्ड चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर सावेडी येथील बालघर प्रकल्पातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांसह बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला.

या अभिवादन कार्यक्रमासाठी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, टाकळी काझीचे ग्रामपंचायत सदस्य हर्षल कांबळे, रुद्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष निखिल शिंदे, तालुका कार्याध्यक्ष कृपाल भिंगारदिवे, तालुका उपाध्यक्ष अजय आंग्रे, गौरव भिंगारदिवे, वैभव बनसोडे, कुणाल भिंगारदिवे, करण भिंगारदिवे, विश्वराज भिंगारदिवे आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेक भिंगारदिवे म्हणाले की, दीन-दलितांना न्याय, हक्क मिळवून देऊन, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी आपले जीवन वाहिले. सामाजिक समता प्रस्थापित करुन त्यांनी अस्पृश्यांना जगण्याचा अधिकार मिळवून दिला. आजही वंचित व दुर्बल घटकांना बाबासाहेबांच्या विचाराने आधार देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बालघर प्रकल्पातील मुलांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांसह बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. रिपाई युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांना खाऊचे वाटप केले. बालघर प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त युवकांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले.