विकासात्मक विचारांमुळे युवा वर्ग शिवसेनेशी जोडला जात आहे -सचिन जाधव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने शहरातील राजकारण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आनखी तापू लागले आहे. मंगलगेट येथील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मनसेचे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या हस्ते भगवा ध्वज देत नव्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेनेचे संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक गणेश कवडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात अभिजीत भगत, संकेत पालवे, विशाल भटेजा, प्रविण सोनवणे, ऋषभ साबळे, जॉय गवारे, अथर्व काशिद, ओंकार भोसले, नितीन जायभाय, श्री पोटगण, सौरभ चिंतामणी, निखिल वडागळे, साहिल सय्यद, शुभम कारखिले, प्रेम शिंदे, युवराज जाधव, सोन्या अरुण, आदर्श गोसावी, पियुष भटेजा, साहिल पवार, हर्षल भिंगारदिवे आदी युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शहर प्रमुख सचिन जाधव म्हणाले की, शहरात मनसे संघटन वाढविण्यासाठी किरण रोकडे यांनी प्रामाणिकपणे काम केले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीने व विचारधारेने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वसामान्यांचा नेता म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, कोणताही भेदभाव न करता सर्व समाजाला सोबत घेऊन विकासाचे राजकारण पुढे घेऊन जाण्याचे ते कार्य करत आहेत. त्यांच्या विकासात्मक विचारांमुळे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात शिवसेनेशी जोडला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच किरण रोकडे यांच्यावर शिवसेनेत योग्य व महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी नगरसेवक गणेश कवडे म्हणाले की, शिवसेनेचे तळागाळापर्यंत सुरू असलेले काम, कार्यकर्त्यांना मिळणारे पाठबळ आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर होणारे प्रभावी काम यामुळे सर्व समाजातील युवक शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये शिवसेनेची प्रतिमा अधिक भक्कम झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षप्रवेशानंतर मनोगत व्यक्त करताना किरण रोकडे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन मी शिवसेनेत सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आहे. कोणतीही वैयक्तिक अपेक्षा न ठेवता केवळ जनतेचे काम व्हावे, या भावनेतूनच शिवसेनेत कामाला सुरुवात करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
