काही लोकप्रतिनिधी जातीयवादाला खतपाणी घालून राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत -दिलीप सातपुते
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मंगलगेट, कोठला येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते व संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख शाहरुख कुरेशी, शाखा प्रमुख अमन शेख, शाखा उपप्रमुख संकेत दिवटे, भाऊसाहेब उनवणे, दिगंबर गेंट्याल, आशुतोष डहाळे, आनंदराव शेळके, सरफराज कुरेशी, तारीक शेख, विनोद शिरसाठ, परेश खराडे, वरूण शेळके आदी उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, शिवसेना शाखेच्या माध्यमातून सर्व समाजातील गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले जाणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी प्रत्येक शाखा पदाधिकारीची आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाण्याचे काम प्रत्येक शिवसैनिक करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, काही लोकप्रतिनिधी जातीयवादाला खतपाणी घालून राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने कधीही जातीयद्वेष केलेला नाही. माजी आमदार स्व. अनिल राठोड यांच्या विचाराने सर्व समाजाला बरोबर घेऊन पक्षाची वाटचाल सुरु आहे.
शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळाल्याने अनेक विकास कामे मार्गी लागली. शहरात सर्व समाजातील युवक शिवसेनेशी जोडले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी शहरात शिवसेनेचा भगवा झंझावात सुरू झाला आहे. शहरात अनेक प्रश्न प्रलंबीत असून, ते शिवसेनेच्या माध्यमातून सुटणार आहे. युवकांना देखील नेहमीच शिवसेनेचे आकर्षण राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.