घर घर लंगर सेवेच्या वतीने वाळकी व खडकी गावात जनावरांसाठी चारा वाटप; मुसळधार पावसाने निर्माण झाला होता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न
लंगर सेवा प्राण्यांची भूक भागविण्यासाठी धावली
नगर (प्रतिनिधी)- कोरोना काळापासून गरजूंची भूकभागविणाऱ्या गुरू अर्जुन देवजी सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिवस सेवा, बलिदान आणि करुणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. माणसांच्या संकटकाळात धावून जाणारी लंगर सेवा प्राण्यांची भूक भागविण्यासाठीही धावली.
मुसळधार पावसाने थैमान घातलेल्या व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवलेल्या नगर तालुक्यातील वाळकी व खडकी गावात जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आले. मुक्या जनावरांना चारा उपलब्ध करुन गुरू अर्जुन देवजी यांना आगळ्या-वेगळ्या पध्दतीने अभिवादन करण्यात आले.
डॉ. जुंदरे आणि डॉ. अनिल कराळे (जिल्हा परिषद) यांनी सदर गावातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याची माहिती दिली. यावर घर घर लंगर सेवेने तातडीने प्रतिसाद देत गुरू अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने 4 टन चारा जुंदरे वस्तीत पाठविण्यात आला. चारा वितरणाची संपूर्ण प्रक्रिया डॉ. अनिल कराळे व वाळकी येथील मुराद शेख यांच्या देखरेखीखाली पार पडली.
जनावरांना योग्य वेळेत चारा उपलब्ध करुन देण्यासाठी घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला होता. जुंदरे वस्तीच्या परिसरात संपूर्ण घरात व शेतात पाणी शिरल्याने पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. लंगर सेवेने केलेल्या मदतीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप भालसिंग यांनी घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून नैसर्गिक संकटात जनावरांसाठी तात्काळ मदत उपलब्ध केल्याबद्दल या उपक्रमाचे कौतुक करुन आभार व्यक्त केले. लंगर सेवेच्या माध्यमातून या परिसरातील जनावरांसाठी 4 टन चारा पाठविण्याचे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. एका वेळचा 15 हजार रुपये खर्च असून, या सामाजिक कार्यास हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी हरजितसिंग वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, गुलशन कंत्रोड, प्रशांत मुनोत, मुन्नाशेठ जग्गी, किशोर मुनोत, सुनील थोरात, राजा नारंग, जतीन आहुजा, अनिश आहुजा, सुनील छाजेड, विपुल शहा, राहुल बजाज, किशोर रंगलानी, राजू जग्गी, कैलास नवलानी, सिमरजीत वधवा, दलजीतसिंग वधवा, राजेश कुकरेजा, कैलास ललवाणी, मन्नू कुकरेजा, प्रमोद पंतम, शरद बेरड, अमरजीत वधवा, सतीश गंभीर, संदेश रपारिया आदी प्रयत्नशील आहेत.