• Sun. Oct 26th, 2025

निमगाव वाघा येथे ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर

ByMirror

Oct 26, 2025

पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग


आरोग्य हीच खरी संपत्ती -उज्वलाताई कापसे (सरपंच)

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेऊन ग्रामस्थांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निमगाव वाघा ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि एशियन नोबल हॉस्पिटल, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच उज्वलाताई कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, डॉ. सारिका उजागरे, शशिकांत साळवे, शोभा चौरे, अमर त्रिभूवन, सीएचओ डॉ. सुवर्णा राऊत, अश्‍विनी झावरे, संगिता आतकर, दिपाली कदम, रेखा ठोंबरे, राहुल डेरे, तसेच युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.


या शिबिरात एशियन नोबल हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी ग्रामस्थांची रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, रक्तचाचणी, नेत्र तपासणी आदी विविध प्रकारची आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर काही रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. गरजू रुग्णांवर महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


सरपंच उज्वलाताई कापसे म्हणाल्या की, आरोग्य हीच खरी संपत्ती असून, निरोगी जीवनासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी गरजेची आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु अशा आरोग्य शिबिरांमुळे आजारांची लवकर ओळख होते आणि योग्य उपचार वेळेत सुरू करता येतात. गावकऱ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संस्था, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचे त्यांनी आभार मानले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, सामाजिक बांधिलकीतून आयोजित केलेले हे शिबिर म्हणजे आरोग्यदायी समाजनिर्मितीचा प्रयत्न आहे. आजच्या तरुण पिढीने केवळ स्वतःच्या नव्हे, तर संपूर्ण गावाच्या आरोग्याबद्दल जबाबदारी घेण्याची गरज आहे. अशा सेवाभावी कार्यात सर्वांनी सहभागी करुन निरोगी व सदृढ समाजाची निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *