• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

भाकपच्या शिष्टमंडळाची लोकसभा निवडणुकीबाबत कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याशी चर्चा

ByMirror

Jan 22, 2024

परभणी व शिर्डी लोकसभेच्या जागेची केली मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी. तसेच राज्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनिती आखणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांना बैठकीला बोलवण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली.


भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी, मुंबई सेक्रेटरी कॉ. मिलिंद रानडे व राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. अशोक सुर्यवंशी यांनी मुंबई येथे सोमवारी (दि.22 जानेवारी) पटोले यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार हुसेन दलवाई उपस्थित होते.


पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ठरल्याप्रमाणे पक्षाच्या वतीने त्यांना पत्र देण्यात आले. या पत्रात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे, की भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष या आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची एकत्रित मिटिंग होणे आवश्‍यक आहे. राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षाशिवाय इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षही कार्यरत आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी आघाडीतील इतर सर्व पक्षांशी विचारविनिमय होणे आवश्‍यक आहे.


भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महाराष्ट्रात परभणी व शिर्डी अशा लोकसभेच्या दोन जागा लढविण्याची तयारी केली आहे. तसेच इतर घटक पक्षांनीही काही विचार केला असेलच. भाकपने परभणीतून कॉ. राजन क्षीरसागर व शिर्डीतून कॉ. ॲड. बन्सी सातपुते यांचे नाव निश्‍चित केले आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी व राज्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी मिळून रणनिती तयार करायला हवी असे सुचवले आहे.

राज्यातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र आहेत, इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचा पराभव करू शकतात असा संदेश जनतेपर्यंत जाणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी नाना पटोले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व घटक पक्षांना 25 जानेवारी रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात येईल, असे सांगितले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *