व्यापारी व दुकानदारांची होणार सोय
भाजप, शिवसेनेच्या सत्ता काळात विकास कामे मार्गी लागतात -सचिन जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मुख्य बाजारपेठांना जोडणारा मंगलगेट येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या हस्ते झाले. या रस्त्यामुळे कोठला, मंगलगेट, मंगळवार बाजार व दाळमंडई येथील व्यापारी व दुकानदारांची सोय होणार आहे.
मंगलगेट येथील हुकमी हनुमान मंदिर परिसरात झालेल्या काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी भरत जाधव, रफिक चमडेवाले, रमेश वाडेकर, अशोक खंडेलवाल, दिपक जोशी, माणिक खताडे, नंदू बेद्रे, वाजिद बी.के. गणेश भिंगारे, प्रदीप कोरडे, विजय जाधव, जितेंद्रकुमार कटारिया, सुभाष शेटे, घनश्याम सापते, राजाभाऊ तोडकर, चंद्रकांत बिडवे आदींसह परिसरातील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सचिन जाधव म्हणाले की, शहराच्या मध्यवस्तीत असलेला व मुख्य बाजारपेठ यांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची दळणवळण सुरू असते. तर अवजड वाहतूक ही मोठ्या प्रमाणात असते. सातत्याने असलेली वाहतुक व पावसाळ्यात पाणी साचून मोठ्या प्रमाणात या रस्त्याची दुरावस्था झाली होती. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याच्या कामासाठी नगरसेविका अश्विनी जाधव यांनी पाठपुरावा केला होता. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. शहरात रस्त्यांची विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे काम मार्गी लागले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जेव्हा भाजप, शिवसेनेची सत्ता राज्यात असते, तेव्हा मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागत असतात. महायुतीच्या सरकारमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात निधी मिळून विकासकामे मार्गी लागली. खड्डेमय शहराची ओळख पुसण्याचे काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झाले असल्याचेही जाधव यांनी सांगितले. उपस्थित व्यापाऱ्यांनी देखील या महत्त्वाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण काम हाती घेतल्याने समाधान व्यक्त करुन आभार मानले.