दिवाळी पाडव्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचा उपक्रम
दुःखात व अडचणीच्या काळात मदतीचा हात देणे, ही खरी माणुसकी -विजय भालसिंग
नगर (प्रतिनिधी)- शहरातील नालेगाव येथील महापालिकेच्या अमरधामला दिवाळी पाडव्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यानी बादल्यांची भेट दिली. अंत्यविधीसाठी आलेल्या कुटुंबीयांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
अमरधामचे व्यवस्थापक स्वप्निल कुऱ्हे यांच्याकडे बादल्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुहासराव सोनवणे, छावा संघटनेचे रावसाहेब काळे, अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वनारसे, ओम चैतन्य गोशाळेचे अध्यक्ष मेजर शिवाजी वेताळ, भाजपचे बाळासाहेब पाटोळे, रयत प्रतिष्ठानचे सचिव पोपट बनकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक कासार, सूर्या मॉर्निंग ग्रुपचे राजकुमार चिंतामणी आदी उपस्थित होते.
विजय भालसिंग म्हणाले की, अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी आलेल्या आप्तेष्ट, नातेवाईक यांना प्रथेनुसार आंघोळ करावी लागते. यावेळी एकाचवेळी अनेक अंत्यविधी असल्यास बादल्यांची कमतरता भासते. अशा दु:खाच्या प्रसंगी आलेल्या नागरिकांची धावपळ व गैरसोय होऊ नये म्हणून अमरधामला बादल्या भेट देण्यात आल्यचे त्यांनी स्पष्ट केले. तर दुःखात व अडचणीच्या काळात सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात देणे, ही खरी माणुसकी असल्याचे त्यांनी सांगितले.
ेॲड. महेश शिंदे म्हणाले की, पक्ष्यांपासून ते मनुष्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कार्य सामाजिक उपक्रमाद्वारे भालसिंग करत आहे. उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना पाण्यासह अन्न-धान्य व कृत्रिम घरटे बसविण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला. समाजाचे ऋण फेडण्यासाठी माणुसकीच्या भावनेने प्रत्येकाने योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.
