विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत अहमदनगर रेल्वे स्थानकच्या विविध प्रश्नांवर चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत अहमदनगर रेल्वे स्थानकच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सोलापूर येथे विभागीय रेल्वे अधिकारी नीरज कुमार डोहरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीत विभागीय सल्लागार सदस्य प्रशांत मुनोत यांनी अहमदनगर शहरासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न मांडला. यासंदर्भात विभागीय अधिकारी नीरज कुमार यांनी सदर रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डकडे पाठवण्यात आलेला असून, त्यासोबत लातूर-पुणेचा प्रस्ताव देखील आहे. या व्यतिरिक्त अहमदनगर रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना थंड व शुध्द पाणी मिळावे, वेंडींग मशीन पुन्हा सुरु करण्याची मागणी करण्यात आली.
विभागीय रेल्वे अधिकारी नीरज कुमार यांनी अहमदनगर मध्ये विश्वस्तरीय मालधक्का तयार करण्यात येणार आहे. भारतात अशा प्रकारचे फक्त दोनच माल धक्के तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये अहमदनगर शहराचा समावेश आहे. जेथे सोयी-सुविधा देखील देण्यात येणार आहे. तर अमृत भारतीय अंतर्गत फूट ओवर बोर्ड ब्रिज म्हणजेच पायी चालणार्यांकरिता पादचारी पुल यांची रुंदी बारा मीटर वाढविण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
मुनोत यांनी पुणे-लखनऊ, पुणे-गोरखपुर या रेल्वेच्या थांब्या संदर्भात देखील मागणी केली. या बैठकीसाठी अतिरिक्त विभागीय रेल्वे अधिकारी शैलेंद्र परिहार, सीनिअर विभागीय वाणिज्य अधिकारी एल.के. रणयेवले, विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त प्रशांत संसारे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक प्रदीप हिरडे आदींसह सोलापूर, लातूर, दौंड, श्रीरामपूर, कुरुडवाडी येथून रेल्वे सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते.