शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, साहित्य व पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ कार्याचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त शहरात झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात डोंगरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी अशोक सुर्यवंशी, प्राचार्य तुळशिराम भोजने, यशवंत सेनेचे शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, सरचिटणीस अजय जाडकर, मच्छिंद्र बिडगर, शर्मिला नलावडे, पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त रेश्मा पुणेकर आदी उपस्थित होते.
स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेले पै. नाना डोंगरे यांनी नगर तालुक्यासह जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी सातत्यपूर्ण व प्रभावी कार्य उभारले आहे. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी अनेक विधायक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिमा, स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जनजागृती, जलसंधारण जनजागृती, रक्तदान शिबिरे अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. महिला बचत गट मेळावे, युवा संमेलने, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून ग्रामीण समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलने तसेच सहा ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

