काटवन खंडोबा रोड परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न पेटला; वीज खंडित, जलवाहिनी फुटली अन् पाणी गायब
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील काटवन खंडोबा रोड रोड, गाझी नगर व सार्इ नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असताना नगरसेवक दत्ता गाडळकर यांनी मध्यरात्री स्वतः धाव घेत नागरिकांना दिलासा दिला. अगोदरच कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, मुख्य जलवाहिनी फुटल्याने निर्माण झालेली अडचण आणि महावितरणच्या वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. अशा परिस्थितीत गाडळकर यांनी स्वतः उपस्थित राहून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
परिसरातील अनेक भागांमध्ये नळांना पाणीच येत नसल्याने नागरिक संतप्त झाले होते. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागत होती. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांनी नगरसेवक दत्ता गाडळकर यांच्याकडे तक्रारींचा पाऊस पाडला. नागरिकांच्या अडचणीची गंभीर दखल घेत गाडळकर यांनी तत्काळ पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधत मध्यरात्रीच परिसरात भेट दिली.
रात्री उशिरापर्यंत त्यांनी स्वतः प्रत्येक भागात जाऊन पाणीपुरवठ्याची पाहणी केली. तब्बल रात्री 1 वाजेपर्यंत परिसरात थांबून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचते का, याची खातरजमा केली. काही भागात कमी दाबाने पाणी येत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीच्या सूचना देत समस्या सोडविण्याचे सूचना केल्या. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी प्रशासनाकडेही पाठपुरावा सुरू केला.
काटवन खंडोबा रोड, गाझी नगर आणि साई नगर परिसरात संपूर्ण उन्हाळाभर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. मुख्य जलवाहिनीतील बिघाड आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. शहरात पाणी उपलब्ध असतानाही महावितरणच्या गलथान कारभारामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची भावना पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
परिसरातील नागरिकांनी सांगितले की, पुढील भागातील अनेक घरांमध्ये नळांना पाणीच येत नाही. काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने दैनंदिन गरजाही भागत नाहीत. वारंवार होणाऱ्या या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबले नाहीत तर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, नगरसेवक दत्ता गाडळकर यांनी नागरिकांना आश्वस्त करत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. पाणीटंचाईच्या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांशी चर्चा सुरू असून नागरिकांना त्रास होऊ देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. गाझी नगर परिसरातील नागरिकांनी मध्यरात्री स्वतः उपस्थित राहून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नगरसेवक दत्ता गाडळकर यांचे परिसरातील महिला वर्गाने आभार मानले.
