आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीवर मार्गदर्शन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो तसेच जीवनात योग्य दिशा मिळते. “विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात मोठे ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. मेहनत, शिस्त आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतेही यश मिळवता येते,” शिक्षणच उज्ज्वल भवितव्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते प्रसाद चंद्रभान शिंदे यांनी केले.
पळशी (ता. पारनेर) येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसाद शिंदे बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मंगेश शिंदे, नामदेव जाधव, शाळेचे मुख्याध्यापक अनिल हिंगडे आणि शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसाद शिंदे यांचा शाळेचे मुख्याध्यापक हिंगडे यांनी सत्कार केला.
पुढे बोलताना शिंदे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे आशीर्वाद आणि स्वतःची मेहनत यांच्या आधारे विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
