• Fri. Mar 13th, 2026

दिव्यांगांनी पोर्टलच्या माध्यमातून विविध योजना व सेवांचा लाभ घ्यावा – देविदास कोकाटे

ByMirror

Mar 13, 2026

दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांसाठी शासनाने स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून विविध योजना व सेवांचा लाभ घेता येणार असून, अधिकाधिक दिव्यांग उमेदवारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देविदास कोकाटे यांनी केले.


जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, युथ फॉर जॉब, जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय, ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळा व मतिमंद मुलांची शाळा आणि दिव्यांगांसाठीचे नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग उमेदवारांसाठीचा रोजगार मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना कोकाटे बोलत होते. मेळाव्यास जिल्ह्यातील 8 नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे 59 उमेदवारांची निवड केली. यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम, डॉ. विद्या जोशी, नितीन जंगम आदींची प्रमुख उपस्थिती होती.


अहमदनगर अपंग कल्याणकारी मंडळाच्या जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयाच्या अध्यक्ष डॉ. विद्या जोशी यांनी दिव्यांग उमेदवारांना रोजगारक्षम व कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व सांगून, सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य केल्यास वैयक्तिक तसेच देशाच्या विकासात योगदान देता येत असल्याचे स्पष्ट केले.


नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर, मुंबईचे सहाय्यक निर्देशक नितीन जंगम यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्तींच्या शारीरिक क्षमतेनुसार योग्य प्रशिक्षण व रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. संगणक संचालन, टेलरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल रिपेअरिंग, ऑफिस मॅनेजमेंट यांसारख्या विविध ट्रेडमध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाते. तसेच पात्र उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा 2 हजार 500 रुपये विद्यावेतन दिले जाते.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) रविकुमार पंतम यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळणे आवश्‍यक असल्याचे सांगून दिव्यांग युवकांनी रोजगार व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्याची गरज व्यक्त केली व कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे, मतिमंद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बनकर, ज्योस्ना कार्यशाळेचे भाऊसाहेब बदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विक्रम उंडे यांनी केले. आभार ज्योती जाधव यांनी मानले.



या रोजगार मेळाव्यात 12 आस्थापनांनी एकूण 188 रिक्त पदे अधिसूचित केली होती. मेळाव्यास उपस्थित 155 उमेदवारांपैकी 124 नोकरी इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. या प्रक्रियेत 78 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, त्यापैकी 59 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. तसेच शासनाच्या विविध रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती आणि रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *