कोंबिंग ऑपरेशन थांबवा; मारहाणीत मयत झालेल्या युवकाच्या खूनाचा गुन्हा पोलीसांवर दाखल करण्याची मागणी
अन्यथा 23 डिसेंबरला रिपाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- परभणी मध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदवून भीम सैनिकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावे, कोंबिंग ऑपरेशन थांबवावे व सोमनाथ सूर्यवंशी मारहाणीत मयत झालेले असताना त्या पोलीसावर खूनाच गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास रिपाईच्या सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी 23 डिसेंबर रोजी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

मंगळवारी (दि.17 डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालया समोर झालेल्या निषेध आंदोलनात रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, विजय शिरसाठ, संदीप वाघचौरे, लखन सरोदे, देवेंद्र वाघमारे, विशाल भिंगारदिवे, विनीत पाडळे, प्रतीक शिंदे, अजय बडोदे, रोहन थोरात, प्रणव गायकवाड, दीपक गायकवाड, गुलाम शेख, नईम शेख, अजीम खान, जमीर सय्यद, तुषार गायकवाड, उमेश गायकवाड, संतोष पाडळे, मुकेश ठसाळ, ज्योती पवार, पूजा साठे, संपदा म्हस्के, हुसेन चौधरी, आदिल शेख, सचिन शिंदे, मनीषा गायकवाड, सुधीर गायलंवाड, जयश्री गायकवाड, सारिका साळवे, ज्योती साठे, सारिका गांगुर्डे, कावेरी भिंगारदिवे, पप्पू पाटील आदींसह रिपाईच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परभणीत नुकतेच एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करुन विटंबना केली. त्यामुळे भीमसैनिकांनी परभणीत आंदोलन केले. त्यावेळी भीमसैनिकांवर वेगवेगळे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अमानुष लाठी चार्ज केला. मागासवर्गीय वस्तीमध्ये वाहनांची तोडफोड काही पोलीस कर्मचारी यांनी केली. अनेक आंदोलकांना अटक केली. पोलीस कस्टडीमध्ये ठेवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आले. मानवतेला काळीमा फासेल अश्या पध्दतीने भीमसैनिकांना मारहाण करण्यात आली. पोलीसांनी केलेल्या या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.
सदर युवकाचा मृत्यू नसून, त्याची हत्या झाली आहे. एवढ्यावरच पोलीस प्रशासन थांबले नसून, त्यांनी कोंबिंग ऑपरेशन चालू केले आहे. त्यामध्ये अनेक निष्पाप युवकांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सर्व मागासवर्गीय असल्याचे अन्याय, अत्याचार सुरु असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, परभणी मधील सर्वच भीमसैनिकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, त्या ठिकाणी सुरू असलेले कोंबिग ऑपरेशन त्वरित थांबवावे, संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.
