• Tue. Feb 24th, 2026

अखिल भारतीय किसान सभेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

ByMirror

Jul 12, 2024

जिल्हा अध्यक्षपदी कॉ. बबनराव सालके व सचिवपदी कॉ.अप्पासाहेब वाबळे यांची नियुक्ती

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय किसान सभेची जिल्हा शाखेची बैठक नुकतीच बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालयात पार पडली. ज्येष्ठ नेते कॉ.दशरथ हासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत किसान सभेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.


बैठकीच्या प्रारंभी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव कॉ. अतुलकुमार अंजान व अन्नपूर्णा परिवाराचे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ. प्रेमाताई पुर्व यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.गेल्या दोन वर्षातील कामकाजाचा अहवाल जिल्हा सचिव कॉ.बन्सी सातपुते यांनी मांडला. त्यावर कॉ. लक्ष्मण नवले, बापु राशिनकर, श्रीधर आदीक, गोरक्ष मोरे, भुलाबाई आदमणे, भारत अरगडे, ॲड. ज्ञानदेव शहाणे, बहिरनाथ वाकळे, रमेश नागवडे यांनी चर्चेत सहभागी होऊन किसान सभेचे काम अधिक जोमाने करण्यासाठी विविध सूचना मांडल्या.


शेतीमालाला हमी भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा, हमी भावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणे कायद्याने गुन्हा ठरवला जावा, कांद्याला किमान 4 हजार रुपये हमी भाव द्यावा, दुधाला अनुदान नको तर गाईच्या दुधाला 40 रूपये तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये हमी भाव द्यावा, पिक विमा कंपन्यांच्या लाभाचे धोरण बदलावे, कापसाला येत्या हंगामात 12 हजार रुपये हमीभाव जाहीर करावे, तर सोयाबीनला 7 हजार रुपये दर द्यावे, कृषी निविष्ठा, बी-बीयाणे किटकनाशके जीएसटी मुक्त करावे आदी मागण्यांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा बैठकित ठराव करण्यात आला.


एकीकडे शेतीसाठी आवश्‍यक असणारे खते, बियाणे किटकनाशके यांची प्रचंड भाववाढ करून शेतीमालाला किरकोळ आधारभूत किंमत वाढवून सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याबद्दल केंद्र सरकारचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. वरील मागण्यांसाठी शेतकऱ्यांना बरोबर घेवून तीव्र संघर्ष सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीचा समारोप गोरक्षनाथ काकडे यांनी नविन पदाधिकारी यांना शुभेच्छा देऊन केले.

अखिल भारतीय किसान सभेची जिल्हा कार्यकारिणी पुढील तीन वर्षासाठी राहणार आहे. नवीन कार्यकारिणीची नावे पुढीलप्रमाणे:-
अध्यक्ष- बबनराव सालके (पारनेर), सचिव- अप्पासाहेब वाबळे (नेवासा), सहसचिव हरीभाऊ गायकवाड, प्रकाश नवले, कार्याध्यक्ष- प्रा.लक्ष्मण डांगे सर, उपाध्यक्ष- बापुराव राशिनकर, गोरक्षनाथ मोरे, सुरेश बागुल, ॲड. भागचंद उकिर्डे, महिला आघाडी उपाध्यक्षा सुलाबाई आदमाणे, कार्यकारिणी सदस्य- प्रा. बबनराव नवले, बहिरनाथ वाकळे, विकास गेरंगे, कैलास शेळके, बाबासाहेब सोनपुरे, सुरेश पानसरे, धोंडीभाऊ सातपुते, प्रा. बबनराव पवार, पांडुरंग शिंदे, मारुती शिंदे, येल्हूबा नवले, अशोक डुबे, लता मेंगाळ यांच्यासह 21 जणांचा समावेश आहे. तसेच 21 जणांचे जिल्हा कौन्सील निवडण्यात आले असून, खजिनदारपदी भगवानराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *