• Tue. Feb 24th, 2026

अहमदनगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नी अबू आजमी यांच्याशी भेट

ByMirror

Jun 23, 2024

मुस्लिम समाजाला टार्गेट करुन दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप

पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्याची मागणी

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात जातीयवादी संघटना व समाजकंटकांकडून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने मशिद, दर्गावर दगडफेक व निष्पाप मुस्लिम युवकांवर प्राणघातक हल्ला केला जात आहे. मुस्लिम समाजात दहशत पसरविण्यासाठी सुरु असलेल्या या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असताना पावसाळी अधिवेशनात नगर शहराचा तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्याचे निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने आमदार अबू आसीम आजमी यांना देण्यात आले.


शहरातील समाजवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे आजमी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शहरात संघटितपणे सुरु असलेल्या या गुन्ह्यातील समाजकंटक आरोपींवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी समाजवादीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसैन, तन्वीर सय्यद, अजहर काजी उपस्थित होते.


18 जून रोजी शहरात दिल्लीगेट येथील शाही मशिद व चितळे रोड येथील दर्गावर दगडफेक करण्यात आली. तर सावेडी मधील बेकरीत काम करणारे युवक झोपलेले असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात समाजकंटकांनी एकत्र येऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घोषणाबाजी करत मोटारसायकलवर शहरात रॅली काढली. मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी षडयंत्र रचून समाजकंटकांचे कृत्य सुरू असल्याचा आरोप समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.


समाजकंटकांच्या या कृत्यामुळे शहरातील मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. समाजकंटकांवर कारवाई होण्यासाठी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पावसाळी अधिवेशनात प्रश्‍न मांडण्याचे आजमी यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *