विविध समविचारी पक्ष आणि संघटनांचा सहभाग; निवडणुका बॅलेटपेपरवर घेण्याची मागणी
निवडणुका बॅलेटपेपरवर न घेतल्यास ईव्हीएम मशीन फोडण्याचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा व ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर बुधवारी (दि.10 जानेवारी) धरणे आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. तर भारतीय निवडणुक आयोगाने येत्या लोकसभेच्या निवडणुका बॅलेटपेपरवर न घेतल्यास ईव्हीएम मशीन फोडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
या आंदोलनात भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट, संजय संसारे, बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, ॲड. प्रकाश लोंढे, गणपत चौरे, राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे (इम्पा) जिल्हाध्यक्ष डॉ. भास्कर रणनवरे, असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शेलार, विनोद साळवे, आम आदमी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कर्डिले, प्रा. रवी सातपुते, विक्रम क्षीरसागर, छावा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, किसान क्रांती मोर्चाचे दत्ता वामन, युसूफ शेख, बाळासाहेब पातारे, विजय पवार, माधव देठे, धनराज चंडाले, वासुदेव राक्षे, श्रीधर शेलार, पाऊल भिंगारदिवे, मोहन शिरसाठ, रविंद्र कांबळे, भिमराव घोडके, छगन भालेराव, सय्यद नूर मोहम्मद, रफिक पठाण, आसिफ शेख, गुड्डू शेख, जावेद शेख, दिलावर पठाण, ज्ञानेश्वर झिंजुर्डे, बाबासाहब सय्यद आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम विरोधात संपूर्ण देशातील 567 जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चार टप्प्यात आंदोलन होत आहे. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.5 जानेवारी) सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम विरोधात राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले आहे. तर आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. 14 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तर 31 जानेवारीला दिल्ली येथील केंद्रीय निवडणुक आयोगाच्या कार्यालयावर भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या मतमोजणीत ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपीएटी मशीन मधील चिठ्ठ्यांची केवळ 1टक्के मतांची तुलना करून निष्पक्ष, पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकत नाही. दोन्हींची शंभर टक्के तुलना होणे आवश्यक आहे. निवडणुकी काळात झालेल्या घोटाळ्यामुळे ईव्हीएम मशीन वरील जनतेचा विश्वास संपत चालला आहे. देशातील अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी ईव्हीएम मशीन वर अविश्वास दाखवलेला आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्या संबंधित पंधरा ते वीस हजार तक्रारीचे प्रकरण भारतीय निवडणुक आयोगाच्या पोर्टलवर नोंद आहेत. निवडणूक आयोगाने अद्यापि अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही दिलेली नाही. निवडणूक आयोग यासंदर्भात असंवेदनशीलता दाखवत असल्याचे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले.
ईव्हीएम मशीनद्वारे पहिले दहा वर्ष सत्ता काँग्रेसने पचवली व पुढील दहा वर्षे सत्ता भाजप उपभोगत आहे. मतांची चोरी ईव्हीएमद्वारे होत असून, निवडणुक आयोग देखील सत्ताधाऱ्यांना साथ देत आहे. या घोटाळ्यामुळे देशाची वाटचाल हुकुमशीकडे सुरु असल्याचा आरोप यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला.
पारदर्शी व लोकशाही पद्धतीने निवडणुका होण्यासाठी ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी भारत मुक्ती मोर्चासह आंदोलनात उतरलेल्या ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.