स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण; महापुरुषांच्या विचारांचा जागर
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचे विचार आजही प्रेरणा देणारे -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखंड इंदिरानगर ग्रुप, भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि हरदिन मॉर्निंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. महापुरुषांच्या विचारांचा जागर घडविण्यासोबतच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळी भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. त्यानंतर भिंगारमधील इंदिरानगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परिसर स्वच्छ करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
यानंतर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून फुलांची उधळण करण्यात आली. उपस्थितांनी महापुरुषांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.
यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, जहीर सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी, अशोक पराते, सचिन चोपडा, दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, सुभाष होडगे, विलास तोडमल, संजय भिंगारदिवे, दीपक धाडगे, ताराचंद ठोकळ, रतन मेहेत्रे, अर्जुन बेरड, भारत ठोकळ, मच्छिंद्र बेरड, असलम शेख, शुभम टाक, विलास मिसाळ, रामचंद्र शिंदे, अनंत सदलापूर, काशिनाथ साळुंखे, प्रकाश माळगे, गोरख वाघुंबरे, सुंदर पाटील, शरद ठोकळ, योगेश चौधरी, सरदारसिंग परदेशी, सुधीर कपाळे, अविनाश पोतदार, विकास भिंगारदिवे, मनोहर दरवडे, दीपक घोडके, रामनाथ गर्जे, प्रकाश देवळालीकर, दीपक अमृत यांच्यासह युवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचे विचार व कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. दोन्ही महापुरुषांनी समाजासाठी स्वत:ला अर्पण करुन दिशा दिली. वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान हीच त्यांना खरी आदरांजली आहे. पर्यावरण संवर्धन, सामाजिक एकात्मता आणि जनजागृतीसाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
सुभाष होडगे म्हणाले की, स्वच्छ परिसर आणि हरित पर्यावरण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. समाजातील युवकांनी पुढाकार घेतल्यास अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. महापुरुषांनी दिलेल्या समानता, बंधुता आणि राष्ट्रसेवेच्या विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे.”
संजय भिंगारदिवे म्हणाले की, महापुरुषांचे कार्य आणि त्यांचे विचार समाजाला नवी दिशा देणारे आहेत. त्यांच्या स्मृतिदिनी सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होते. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक सलोखा या मूल्यांना बळकटी देण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
सचिन चोपडा म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ जयंती व स्मृतिदिन साजरा करण्यापुरता मर्यादित नसून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी व्यक्त करणारा आहे. युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला तर समाज अधिक प्रगत आणि सुसंस्कृत होईल. महापुरुषांचे विचार आत्मसात करून सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताची भावना जोपासणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

