• Tue. Jun 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

पारनेर तालुक्यातील कृषी सेवा केंद्राची चौकशी व्हावी

ByMirror

Jul 29, 2022

युरिया खताची टंचाई निर्माण करुन शेतकर्‍यांची अडवणुक केली जात असल्याचा आरोप

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- पेरणीनंतर जाणीवपूर्वक युरिया खताची टंचाई निर्माण करुन शेतकर्‍यांची अडवणुक करणार्‍या पारनेर तालुक्यातील कृषी सेवा केंद्राची चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


पारनेर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात युरिया खताचा कायमचा तुटवडा निर्माण होत आहे. पारनेर तालुका एकतर कायम दुष्काळी भाग आहे. यावेळी झालेल्या थोडाफार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणी केली. अशा परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांनी घेतलेल्या पिकांसाठी युरिया खताची गरज पडू लागली आहे. परंतु पारनेर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांनी मनमानी करून युरियाची टंचाई असल्याचे दाखवले जात आहे. युरिया मिळवण्यासाठी कृषी सेवा केंद्रात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. पाऊस जर झाला नाही, तर युरिया भेटूनही उपयोग होत नाही. अशा प्रकारे शेतकरी पूर्ण हवालदिल झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


वारंवार युरिया तुटवडा निर्माण होत असल्याने सर्व कृषी सेवा केंद्राची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *