कांशीराम यांनी बहुजन समाज व शेतकरी वर्गाला न्याय देण्याचे काम केले -संतोष जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने पार्टीचे संस्थापक नेते कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कांशीराम अमर रहे!… च्या घोषणा देऊन त्यांना त्रिशरण व पंचशील वंदना देण्यात आली.

या अभिवादन कार्यक्रमासाठी बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, शहर प्रभारी संजय डहाणे, शहर उपाध्यक्ष सिध्दार्थ पाटोळे, सचिव राजू गुजर, बी.व्ही.एफ. आकाश जंजाळ, बौध्दाचार्य अण्णासाहेब गायकवाड, बाळासाहेब मधे, उमाशंकर यादव, राजू शिंदे, विशाल जगधने, संदीप वरकड, रामचंद्र पवार, रविंद्र नामदे, नंदलाल परदेशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराध्यक्ष संतोष जाधव म्हणाले की, कांशीराम यांनी बहुजन समाज संघटित करुन सत्ता मिळवली. बहुजन समाज व शेतकरी वर्गाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. देशात जातीयवादी सरकार सत्तेत असून, बहुजन समाज व शेतकरी वर्गावर अन्याय, अत्याचार सुरु आहे. कांशीराम यांच्या विचाराने बहुजन समाज जोडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय डहाणे यांनी समाजाला कांशीराम विचारांची गरज असून, त्यांचे विचार घेऊन बसपा बहन मायावतींच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. कांशीराम यांनी महाराष्ट्रात राहून फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले. या विचारांनी त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाजाला एका छताखाली आनले होते. हे विचार घेऊन पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणात कांशीराम यांच्या स्मृतींना उजाळा दिला.