कार्यासन अधिकारीच्या लेखी पत्राने आझाद मैदानातील उपोषण अखेर मागे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच बदली झालेले पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे काही पोलीस कर्मचारींच्या गैरकारभार विरोधात अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात सुरु असलेले उपोषण तिसर्या दिवशी कार्यासन अधिकारी (महाराष्ट्र शासन) यांच्या लेखी आश्वासनाने मागे घेण्यात आले.
पारनेर तालुक्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक व त्याचे काही पोलीस कर्मचारी पिडीत तक्रारदारांवर कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद नसताना रात्री-अपरात्री त्यांच्या घरी जावून मारहाण करणे, त्यांना उचलून पोलीस स्टेशनला आणने व धमकावून अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुरु असलेल्या पिळवणुकीविरोधात तक्रार करुन देखील न्याय मिळत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी आझाद मैदानात उपोषण सुरु केले होते.
पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या काही सहकारी कर्मचार्यांनी कुठलाही गुन्हा नोंद नसताना माजी सैनिक प्रशांत ठुबे (रा. बाबुर्डी), बबन बर्डे (रा. वनकुटे) व समशुद्दीन सय्यद (रा. पोखरी) यांना जाणीवपूर्वक अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी मनमानी पद्धतीने मारहाण करून पोलीस स्टेशनला आणले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या निहाय पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी यांची ड्युटी बटवाडा व रजिस्टर नक्कल, पोलीस निरीक्षक रात्र गस्तीची दप्तर चौकशी, त्यांचे मोबाईल लोकेशन व मोबाईलची सीडीआर तक्रारीनुसार तपासणी करावी व यामध्ये दोषी असणार्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
कार्यासन अधिकारी (महाराष्ट्र शासन) अजित तायडे यांनी तक्रारीची शाहनिशा करुन वस्तुस्थिती आधारे यथोचित कार्यवाही करण्याचे पोलीस महासंचालकांना लेखी पत्राद्वारे सूचना केल्याने सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.