भारत की बेटी सक्षम बेटी अभियानाची सुरुवात
विजया लक्ष्मण काळे फाऊंडेशन व पंचायत समितीचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलींना न घाबरता निर्भयपणे समाजात वावरता यावे व स्वत:चा बचाव करण्याच्या उद्देशाने विजया लक्ष्मण काळे फाऊंडेशन व पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी भारत की बेटी सक्षम बेटी अभियानाची सुरुवात करण्यात आली. उपक्रमशील शिक्षिका अनिता काळे व पंचायत समितीच्या विषय शिक्षिका मायाताई हराळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, या अभियानातंर्गत वडगाव गुप्ता (ता. नगर) केंद्रातील गजानन वसाहत जिल्हा परिषद शाळेतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.

अनिता काळे म्हणाल्या की, मुलींना सक्षम करण्यासाठी क्रीडांगणाकडे घेवून जाण्याची गरज आहे. मनाचे व शरीराचे स्वास्थ्य सांभाळत परिस्थिती व संकटाचा सामना करावा लागणार आहे. स्वसंरक्षणासाठी सज्ज होणे काळाची गरज असून, मुलींनी वेळप्रसंगी आपल्यातील दुर्गाचे रुप दाखविण्याचे त्यांनी आवाहन केले. तर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मायाताई हराळ यांनी मुलींना लाठी-काठी चालविण्याचे धडे देऊन, संकटकाळात स्वसंरक्षणावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, मुलींनी न डगमगता परिस्थितीचा सामना करावा. सक्षम होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. काळे याना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मिनाक्षी जाधव, अर्चना ऐखंडे, शाळेच्या मुख्याध्यापिका संध्यादेवी पाटील, प्रतिभा साठे, आश्विनी आव्हाड, कल्पना पिंपरकर, सुनिता चव्हाण, सुरेखा शिंदे, अलका शिदोरे, राजाबाई सरोदे, इंदूमती बोरुडे, यशवंत आमले, कुलकर्णी आदींसह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या उपक्रमास शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

