विद्यार्थ्यांनी घेतला निर्भय व नि:पक्ष मतदानाचा संकल्प
मतदानातूनच लोकशाही मजबूत होईल -ज्योतीताई कुलकर्णी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंद सेवा मंडळ संचलित भाई सथ्था नाईट हायस्कूल येथे मतदार जागृती अभियान राबवून लोकशाहीचा जागर करण्यात आला. “जागर लोकशाहीचा” या उपक्रमाअंतर्गत आयोजित या कार्यक्रमात नाईट शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता, निर्भय, नि:पक्ष व धर्मनिरपेक्षपणे मतदान करून लोकशाही अधिक सक्षम करण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रात्र शाळेच्या चेअरमन ज्योतीताई कुलकर्णी उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर रात्र शाळेचे प्राचार्य सुनील सुसरे, ज्येष्ठ शिक्षक गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत, शरद पवार, अमोल कदम, शिवप्रसाद शिंदे, उज्वला साठे, बाळू गोरडे, संदेश पिपाडा, मंगेश भुते, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अशोक शिंदे, स्वाती होले, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, अनुराधा दरेकर, वृषाली साताळकर, वैशाली दुराफे, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. तसेच रात्र शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ज्योतीताई कुलकर्णी म्हणाल्या की, “मतदानामुळेच लोकशाही मजबूत होते. आपल्या एका मताने सक्षम, प्रामाणिक व जबाबदार लोकप्रतिनिधी निवडून दिल्यास त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडविले जाऊ शकतात. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, आपल्या मतातूनच लोकशाहीला बळ मिळते. मतदान समाजाचे आणि देशाचे भविष्य घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.”
प्रास्ताविकात प्राचार्य सुनील सुसरे यांनी मतदानाचे महत्त्व विशद करत प्रत्येक नागरिकाने लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. नाईट हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः मतदान करून, पालकांचे व मतदानास पात्र समाजातील सर्व नागरिकांचे मतदान शंभर टक्के घडवून आणावे तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता शांत, निर्भय व निकोप वातावरणात सक्षम उमेदवाराला मतदान करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शालेय शिक्षक शरद पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजावण्याची शपथ दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
