भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम; देशभक्तीच्या गगनभेदी घोषणा
भारतीय सेनेने दहशतवादी पोसणाऱ्यांना धडा शिकवला -सुनिल साळवे
नगर (प्रतिनिधी)- शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या शौर्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तिरंगा सन्मान यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. मार्केटयार्ड परिसरातून रॅलीचे मार्गक्रमण झाले. यावेळी भारत माता की जय…, भारत जिंदाबाद… पाकिस्तान मुर्दाबाद!, वंदे मातरम…च्या घोषणांनी परिसर दणाणला.
केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले व जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली या तिरंगा सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हातात तिरंगा झेंडे घेऊन रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व बौध्द भिक्खू रॅलीत सहभागी झाले होते.
याप्रसंगी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, पूज्य भनतेजी संजय कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजयराव भांबळ, गणेश कदम, शिवाजीराव साळवे, राजा जगताप, कविता नेटके, माया जाधव, अमित काळे, बाळासाहेब नेटके, बापू जावळे, अविनाश घोडके, काळू ससाने, शितल घोडके, रोहित कांबळे, निखिल सूर्यवंशी, योगेश घोडके, पप्पू जगताप, उत्कर्ष भालेराव, आदर्श साळवे आदी उपस्थित होते.
सुनील साळवे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना कठोरपणे उत्तर दिले आहे, ज्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे. भारतीय सैनिकांनी दहशतवादी आणि त्याला पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून चांगलाच धडा शिकवला. भारतीय सैनिकांचे बलिदान आणि त्यांचा पराक्रम देशाच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व रिपाईचे कार्यकर्ते त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी एकत्र आले असल्याचे त्यांनी सांगितले. अतिशय उत्साहवर्धक व देशभक्तीने प्रेरित अशा वातावरणात ही यात्रा संपन्न झाली.