निलंबन रद्द होऊनही कामावर रुजू करुन घेत नसल्याने तिसऱ्या दिवशीही कुटुंबीयांसह उपोषण सुरु
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक प्रकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- निलंबन रद्द होऊनही पुन्हा कामावर रुजू करुन घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लार्क नितीन मेहेर यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर कुटुंबीयांसह सुरु केलेले उपोषण रविवारी (दि.8 सप्टेंबर) तिसऱ्या दिवशीही सुरु होते. शनिवारी संध्याकाळी मेहेर यांची अचानक तब्येत खलवल्याने जिल्हा रुग्णालयातील पथक त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले होते. तब्यत खालावून देखील जो पर्यंत कामावर रुजू करुन घेत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा आक्रमक पवित्रा मेहेर यांनी घेतला आहे. संपूर्ण मेहेर कुटुंबीय उपोषणात सहभागी झाले आहेत.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लार्क नितीन मेहेर यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यांच्या बरोबरचे निलंबित झालेले सर्व कर्मचारी यांना वशिलेबाजी करून पुन्हा कामावर हजर करुन घेण्यात आले. मेहेर यांचे निलंबन रद्द होऊनही त्यांना अद्यापि कामावर रुजू करुन घेतलेले नाही. बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने संगनमत करुन कामावर रुजू करुन घेण्यासाठी रोखले असल्याचा आरोप मेहेर यांनी केला आहे.
बँकेतून निलंबन केल्याने कुटुंबाच्या उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नोकरी हाच एकमेव उत्पन्नाचे साधन असल्याने नोकरीवर रुजू करुन घेतले जात नसल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बँकेतून निलंबित केलेल्या इतर अधिकारी, कर्मचारी प्रमाणे पुन्हा रुजू करुन घ्यावे, निलंबन काळात कोणताही उदरनिर्वाह भत्ता अथवा पगार दिलेला नसून, तो त्वरित देण्यात यावा, निलंबन रद्द झाल्याने न दिलेला पगार 50 टक्के बँकेने त्वरीत देण्याची मागणी मेहेर कुटुंबीयांनी केली आहे.