भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या श्रमिकनगर शाखेची त्रैवार्षिक पक्ष परिषद उत्साहात
विविध मुलभूत प्रश्नांवर चर्चा; मागण्यांसाठी संघर्ष करण्याचा संकल्प
नगर (प्रतिनिधी)- मूलभूत अधिकार घटनेने दिले असून, ते सरकारने सर्वसामान्यांना सन्मानाने दिले पाहिजे. ते मिळत नसतील तर, मूलभूत व स्थानिक प्रश्नावर लढे करणे आवश्यक बनले आहे. मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून, आरक्षण आणि धर्माचे प्रश्न उभे करुन व नागरिकांना भ्रमित करुन सरकार झुंजविण्याचे काम करत असल्याचा आरोप भाकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. बन्सी सातपुते यांनी केला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या श्रमिकनगर शाखेची त्रैवार्षिक पक्ष परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत अध्यक्षीय भाषणात कॉ. सातपुते बोलत होते. भाकपच्या राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. स्मिताताई पानसरे, प्रा. गणेश विधाटे, कॉ. भारती न्यालपेल्ली, संगीता कोंडा, शोभा पासकंटी, निर्मला न्यालपेल्ली, सुनंदा पेद्राम आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे कॉ. सातपुते म्हणाले की, भांडवलदारांचे सरकार असल्याने सर्वसामान्यांच्या हिताकडे लक्ष दिले जात नाही. सर्वत्र खाजगीकरणाचा सपाटा लावला असल्याने आरक्षण आपोआप संपणार आहे. शिक्षणाची दुकानदारी सुरू असल्याने सर्वसामान्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नवीन कामगार संहिता कायद्याने श्रमिक, कष्टकरी कामगारांनी लढून मिळवलेल्या हक्कांवर गडांतर आणण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हा पक्ष परिषद तीन वर्षानंतर होत असून, पक्षाची पुढील वाटचाल व मागील तीन वर्षाचा आढावा घेतला जात असल्याची माहिती दिली.
कॉ. स्मिता पानसरे म्हणाल्या की, मोदी एककेंद्रित सरकार आहे. सर्वाधिकार एका व्यक्तीकडे एकवटले आहेत. लाडकी बहिणे योजना गुंडाळण्याचे काम सुरु असून, निवडणुकापर्यंत सर्व बहिणी लाडक्या होत्या. कोणतीही अट न घालता प्रत्येकाला पैसे मिळाले पाहिजे. शिक्षण, नोकरी, महागाई हे प्रश्न डोक्यातून काढून प्रत्येकाला देव धर्मात अडकवले जात आहे. विविध प्रश्नांवर आंदोलन, उपोषण कमी झाले. आंदोलन दडपण्याचे काम सुरु आहे. सरकारच्या धोरणामुळे महागाई वाढत आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या शिक्षणाचा व रोजगाराचा प्रश्न गंभीर असून, या प्रश्नासाठी मायबाप सरकारकडे कोणतेही धोरण नसल्याचे, त्या म्हणाल्या.
प्रा. गणेश विधाटे यांनी कम्युनिस्ट पक्षाचा अभ्यास करताना या पक्षाशी नाळ जुळली. कम्युनिस्ट पक्षाने श्रमिक, कष्टकरी वर्गाचे नेतृत्व करुन तळमळीने त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. उजवीकडे झुकलेली व्यवस्था सध्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम करत आहे. जात-धर्मात एकोपा झाला तर देशाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात 11 महिलांची कौन्सिल निवड करण्यात आली असून, ते जिल्ह्याच्या 14 जून रोजी होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनात सहभागी होणार आहे. यामध्ये अध्यक्ष- संगीता कोंडा, उपाध्यक्ष- सगुणा श्रीमल, सचिव- भारती न्यालपेल्ली, रेणुका अंकारम, शारदा बोगा, भाग्यलक्ष्मी गड्डम, सुनंदा पेद्राम, सविता कोक्कुल, सुमित्रा जिंदम, शोभा बिमन, लक्ष्मी कोटा यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती न्यालपेल्ली यांनी केले. आभार संगीता कोंडा यांनी मानले.