गावपातळीवर जातीयवादाविरुद्ध लढण्यासाठी व्यापक मोहिम जाहीर
शहरात झालेल्या बैठकीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पुढाकाराने जनआंदोलन उभारण्याचा निर्धार
नगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यात वाढत्या दलितांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातील प्रमुख पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांची आढावा बैठक नुकतीच शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत गाव पातळीवर उफाळलेल्या जातीयवादाचा समाचार घेण्यासाठी भीम आर्मीच्या माध्यमातून एक व्यापक जनजागृती मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी जिल्ह्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीचे नेतृत्व नाथाभाऊ आल्हाट यांनी केले. यावेळी सल्लागार सदस्य तथा केंद्रिय रेल्वे मंत्रालय व दूरसंचार मंत्रालयाचे डॉ. आदित्य पतकराव, आझाद समाज पार्टीचे मुख्य महासचिव ॲड. क्रांती सहाने, महाराष्ट्र युवा प्रभारी वैभव चाबुकस्वार, राज्य महिला सचिव विजया साठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाला संघटित करून त्यांच्यात जनजागृती निर्माण करण्यासाठी लवकरच एक भव्य सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेला भीम आर्मी पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद व महाराष्ट्र युवा प्रभारी वैभव चाबुकस्वार प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. आदित्य पतकराव यांनी दिली.
दलितांवरील अन्यायाच्या घटनांमध्ये सत्ताधारी गट पोलीस प्रशासनावर दबाव टाकून दडपशाहीची भूमिका घेत आहेत. त्यामुळे दलितांना न्याय मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. आदित्य पतकराव म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दलितांवरील अत्याचाराची प्रकरणे गंभीर स्वरूपाची आहेत. आजही गावांमध्ये शांतता नाही, दलितांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. नगर जिल्हा या बाबतीत आघाडीवर असून, आम्ही सर्वजण मिळून या अन्यायाविरुद्ध निर्णायक लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाथाभाऊ आल्हाट यांनीही ठाम भूमिका मांडत म्हणाले की, दलितांना संरक्षण देण्यासाठी जिल्ह्यातून मोठी ताकद उभी करण्यात येणार आहे. आंबेडकरी जनता एकत्र आल्यास जातीयवादाला मूठमाती देता येईल. समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना या चळवळीत सामील करून प्रशासनावरही दबाव टाकण्याचे काम होणार असल्याचे सांगितले. शेवटी, उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधानाच्या मार्गाने न्याय मिळवण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारण्याचा व गावा-गावातील दलितांवरील अन्याय थांबविण्यासाठी नाथाभाऊ आल्हाट यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केला.
या बैठकीला भीमसैनिक किरण शिंदे, नंदू वाकडे, भागचंद सोनवणे, संदीप भिंगारदिवे, बॉक्सर भाई, अरुण शिंदे, आकाश शिंदे, लखन सरोदे , दीपक (भैय्या) गरुड, जालिंदर साळवे, विवेक घोडके, बाळासाहेब कांबळे, सुहास साठे, दीपक शिंदे, गोरख शिंदे, सचिन शिंदे, सतीश शिंदे, सुभाष गायकवाड, योगेश निकम, संदीप पगारे, प्रवीण साळवे, जयदेव गोगले, कल्याणी साळवे, भरत मनतोडे, ससाने आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.