मंगलगेट येथे स्वागत
शिवसेना जनतेशी जोडला गेलेला पक्ष -रामजी रेपाळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामजी रेपाळे यांनी माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्या संपर्क कार्यालयास भेट देत युवा कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी शहरात पुन्हा प्रभावीपणे शिवसेनेचे संघटन उभे करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय राहण्याच्या सूचना दिल्या.
मंगलगेट परिसरात सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली रेपाळे यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख संभाजी कदम, संग्राम कोतकर, आशिष शिंदे, भूषण गुंड, किशोर बेद्रे, बंटी बेद्रे, नितीन सुरसे, मयूर कराळे, रोहित पाथरकर, विशाल गायकवाड, विनोद शिरसाठ, सचिन सापते, अक्षय भिंगारे, रावसाहेब जाधव, विशाल सिद्ध, अभिजीत अष्टेकर, अक्षय कोंडावार, विजय जाधव, सतीश काळे यांच्यासह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
रामजी रेपाळे म्हणाले की, शिवसेना ही केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर ती सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे. गेल्या काही वर्षांत अनेक आव्हाने आली, बदल झाले; मात्र शिवसेनेचा मूलभूत विचार कधीच बदललेला नाही. आज गरज आहे ती संघटन पुन्हा मजबूत करण्याची आणि प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांपर्यंत पोहोचण्याची. शिवसेना जनतेशी जोडला गेलेला पक्ष असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सर्वसामान्यांसाठी काम करत आहे, आणि हे कार्य अधिक प्रभावी करण्याची जबाबदारी तुमच्या-आमच्या सर्वांवर असल्याचे ते म्हणाले.
सचिन जाधव म्हणाले की, “युवा वर्ग मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आकर्षित होत आहे. कारण शिवसेना ही युवांच्या भावना समजून घेणारी आणि त्यांना संधी देणारी संघटना आहे. आजचा युवक बदल घडवू शकतो, आणि शिवसेना त्याला योग्य दिशा देत आहे. पक्षाने अनेक राजकीय चढ-उतार पाहिले असले तरी, शिवसेनेचा विचार आणि कार्यकर्त्यांची निष्ठा कायम राहिली आहे. शहरात पुन्हा एकदा संघटन बळकट करून जनतेचा विश्वास जिंकण्याचे काम आपण सर्वांनी एकजुटीने करायचे आहे. प्रत्येक प्रभागात सक्रियपणे काम करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान उपस्थित युवकांनीही आपली मते मांडत संघटनासाठी सक्रिय भूमिका निभावण्याचा निर्धार व्यक्त केला.
