• Sat. May 31st, 2025

शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या शिवसैनिकांचे शहरात स्वागत

ByMirror

Mar 29, 2025

हिंदुत्वाचे विचार घेऊन कार्य करणाऱ्या शिवसैनिकांना एकत्र आणले -अनिल शिंदे

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार

नगर (प्रतिनिधी)- समाजात हिंदुत्वाचे विचार घेऊन कार्य करणाऱ्या शिवसैनिकांना एकत्र आणले. जुने, नवीन सहकाऱ्यांना एकत्रित करुन पक्षाची मोट बांधण्यात आली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला सक्षमपणे सामोरे जावून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यात येणार असल्याचा विश्‍वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी व्यक्त केला.


नगर शहर व तालुक्यातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) प्रमुख नेते व पदाधिकारी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शहरात परतले असताना त्यांचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी स्वागत करुन सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शहर प्रमुख सचिन जाधव, दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी नगरसेवक गणेश कवडे, संजय शेंडगे, आप्पा नळकांडे, दत्ता जाधव, दत्ता कावरे, बाळासाहेब बोराटे, संदेश कार्ले, शरद झोडगे, डॉ. दिलीप पवार, गुलाब शिंदे, रामदास भोर, अशोक दहिफळे, सुरेश क्षिरसागर, संजय आव्हाड, सुनील लालबोंद्रे, अनिल लोखंडे, सचिन शिंदे, आशिष शिंदे, ओंकार शिंदे, संतोष ग्यानप्पा, संग्राम कोतकर, योगेश गलांडे, प्रल्हाद जोशी, अभिजीत अष्टेकर, सुरेश तिवारी, दामोदर भालसिंग, रवींद्र लालबोंद्रे, प्रशांत गायकवाड, घनश्‍याम घोलप, बबलू शिंदे, अक्षय भिंगारे, भरत कांडेकर, अभि कोतकर, घनश्‍याम घोलप आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे शिंदे म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे जात आहे. त्याच विचारेने सर्व शिवसैनिक त्यांच्या मागे एकवटले आहेत. शहरासह नगर तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


संदेश कार्ले म्हणाले की, पूर्वीपासूनच हातात धनुष्य घेऊन शिवसेनेच्या विचाराने काम सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकारणाचा वसा घेऊन वाटचाल करीत आहे. सर्वसामान्य जनतेचे काम होण्यासाठी सत्तेबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या जलजीवन मिशन, साकळाई या महत्त्वपूर्ण योजना शिवसेनेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून काम करून जनतेला न्याय दिला जाणार आहे. जनतेच्या हितासाठी सत्तेचा उपयोग केला जाणार असून, अधिक वेगाने काम करण्याची संधी पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


सचिन जाधव यांनी शिवसेनेचा झंजावात शहरासह तालुक्यात आणि जिल्ह्यात निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी कल्याणकारी योजना राबवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. याच भूमिकेतून त्यांच्या मागे शिवसैनिकांसह जनता देखील एकवटली जात असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश कवडे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सहकाऱ्यांचे स्वागत करून एकजुटीने वाटचाल केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *