निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल; अभिनेते तेजस बर्वे यांच्या हस्ते होणार सन्मान
नगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल भारत गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समृद्धी प्रकाशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शांताई फाऊडेशन (पुणे) व हिरकणी महिला विकास संस्था (कोरेगाव भिमा) यांच्या वतीने भालसिंग यांना अभिनेते तेजस बर्वे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती प्रा. डॉ. बी.एन. खरात यांनी दिली.
रविवार दि.27 जुलै रोजी पुणे येथील पत्रकार भवनमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रंगणार आहे. विविध क्षेत्रात पुरोगामी विचाराने निस्वार्थ कार्य करणाऱ्यांचा सन्मान होणार आहे. विजय भालसिंग सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. मुळगाव वाळकी (ता. नगर) येथील असलेले भालसिंग एसटी बॅकेची नोकरी सांभाळून निस्वार्थपणे कार्यरत असून, कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सामाजिक कार्य करत आहे. वृक्षरोपण व संवर्धनासाठी ते सातत्याने योगदान देत आहे.
उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून पाणवठे तयार करुन पाणी उपलब्ध करणे, विविध परिसरात पक्ष्यांसाठी झाडांवर धान्य व पाण्याची भांडी बसविणे, सर्वत्र वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे पशु-पक्ष्यांचे अस्तित्व राहण्यासाठी नारळाच्या साली पासून कृत्रिमरीत्या पक्ष्यांसाठी बनवलेले घरटी बसविणे, विविध ठिकाणी वृक्षारोपण आदी निसर्ग व पर्यावरणपुरक उपक्रम ते सातत्यानेराबवित आहे. तसेच दरवर्षी आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीची सेवा करत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुणे येथील मानाचा भारत गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी देखील भालसिंग यांना सामाजिक क्षेत्रातील विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भालसिंग यांचे अभिनंदन होत आहे