खंडात रक्ताचा पूर वाहणार, पाऊस कमी होणार
होईक ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे झालेल्या होईकात (भविष्यवाणी) दहा खंडात चळवळ होऊन दिनमान काळा होणार असल्याचे म्हणजेच सर्वच क्षेत्रात चळवळी होऊन अस्थिरता निर्माण होणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले. तर खंडात रक्ताचा पूर वाहणार म्हणजेच युध्दजन्य परिस्थिती राहणार व जेठुडी कठिण जाईल म्हणजेच पाऊस कमी होणार असल्याचे सांगण्यात आले.

होईकच्या या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील वर्षी ज्वारीची व मुगराळची मोडघड होणार असल्याचे सांगण्यात आलेले भाकित यावर्षी उशीराने व कमी झालेल्या पाऊसाने खरी ठरली. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक सांगताना पुढील वर्षी येणाऱ्या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांच्या भाकितामधून पुढील वर्ष अत्यंत कठिण राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पशु हत्या बंदीचे पालन करुन देवाला भाजी-भाकरीचा नैवद्य दाखविण्यात आला. सकाळी आरेवाडी बिरोबा देवस्थानचे पुजारी जगन्नाथ कोळेकर व त्यांचे सहकारींनी बिरोबाची व बाळू मामाची कथा धनगरी ओव्यांतून सादर केली. देवाचे भगत नामदेव भुसारे यांच्या अंगात वारे संचारल्यानंतर त्यांनी स्वत:च्या अंगावर वेताचे फटके ओढून होईक (भविष्यवाणी) सांगितले.

होईकात ते म्हणाले की, बाया न्हात्यान, धुत्यान व पालखीत मिरत्याल. लक्ष्मीला म्हणजेच पशु धनाला पिडा असल्याचे त्यांनी सांगितले. बाळाला यावर्षी संकट नसून, चित्ता सवातीचा पाच ते अडीच दिवस तीन खंडात आभाळ फिरेल. दिवाळीच दिपान तीन ते सात दिवस आभाळ येऊन काही ठिकाणी पाऊस पडेल. सटीच सटवान सात खंडात फिरुन कर्मभागी पाऊस होणार आहे. गायी देठाला लागून, नव तूप होणार नाही. सध्याच्या पिकांना रोगराई असणार आहे.
सोने, कापूस, गहू, हरभराचे मनभाव राहणार असल्याचे सांगितले. तर कल्याण कुर्तिकाचा नऊ ते सात दिवस पाच खंडात आभाळ फिरुन पाऊस होणार. मुगराळ्याची पेर कमी होणार, ज्वारीची घडमोड होईल व गहू, हरभराची पेर होईल, असे भाकीत सांगण्यात आले आहे.

गावातील होईकाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, गोकुळ जाधव, बाबासाहेब जाधव, रामदास वाखारे, अंशाबापू शिंदे, बाबा पुंड, संजय डोंगरे, पांडुरंग गुंजाळ, बबन कापसे, अनिल डोंगरे, बाळू भुसारे, रोहीदास रोहकले, अशोक भुसारे, परबती कदम, अंबादास निकम, नवनाथ जाधव, सुरेश जाधव, ठकाराम शिंदे, गुलाब कापसे, अजय ठाणगे, अतुल फलके, भागचंद जाधव, अरुण कापसे, रावसाहेब भुसारे, एकनाथ भुसारे, राजू भुसारे, गुलाब जाधव, शिवाजी पुंड आदी उपस्थित होते. मा. संपादक कृपया