दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने बेघर व निराधार मनोरुग्णांसाठी सुसज्ज सुविधा
“मानवसेवा हीच जीवनप्रतिज्ञा” -दिलीप गुंजाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव येथे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पांतर्गत बेघर, निराधार व पीडित मनोरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. या नव्या वास्तूमुळे संस्थेच्या समाजकार्याला नवे बळ मिळणार असून निराधार घटकांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.
इमारतीचे उद्घाटन दानवीर रमणलालजी लुंकड, ज्येष्ठ समाजसेवक सुवालाल शिंगवी तसेच सुजन बिंदू यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अमरलालजी दर्डा, राजू दळवी, नाना भोरे, संतोष धुमाळ, जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे प्रशांत गायकवाड, सराफ व्यावसायिक संजय शिंगवी, संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ, उपाध्यक्षा शारदा होशिंग, अविनाश मुंडके, संजय गटागट, माजी अध्यक्षा मिरा जाधव, आकाश लुंकड, लौकिक शिंगवी, गुंजन शिंगवी, डॉ. सुरेश घोलप, विजयकुमारजी कटारिया, तुलशीकुमारी कोका आदी मान्यवर उपस्थित होते.
या इमारतीच्या बांधकामासाठी दानवीर भामाशाह रमणलालजी लुंकड व लुकड परिवार, प्रियंका आणि जयंत गुलवडी (ऑस्ट्रेलिया), डॉ. विजय सोनार, अजय अमरलालजी दर्डा, तुलसी कुमारी कोका, ब्रिटीश संगीत निर्माता सुजन बिदु, भारतीय ब्रिटीश गायक संगीतकार बिदु अपाइच तसेच रेलफॉर फाऊंडेशन (पुणे) चे दिपकजी नाथानी यांनी उदार अर्थसहाय्य केले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे ही सुसज्ज इमारत उभी राहू शकली.
आकाश लुंकड म्हणाले की, बेघर, निराधार व पीडित मनोरुग्णांसाठी संस्थेने सुरू केलेले कार्य अत्यंत महान आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना आधार देण्याचे हे पवित्र कार्य आहे. या नव्या इमारतीमुळे अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील आणि उपचार व पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळेल. समाजातील प्रत्येकाने या कार्यात हातभार लावावा.”
संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी संस्था स्थापनेमागील प्रेरणादायी घटना सांगताना उपस्थितांना भावूक केले. त्यांनी सांगितले की, “रस्त्यावर असहाय अवस्थेत बसलेल्या एका मातेचे आणि तिच्या आजारी बालकाचे दुःखद चित्र पाहून माझे मन हेलावले. त्या क्षणी निराधारांसाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला. आज या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेकांना आधार देता येतो, हीच माझ्यासाठी खरी समाधानाची बाब आहे. मानवसेवा हा केवळ प्रकल्प नसून ती माझी जीवनप्रतिज्ञा आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेतील लाभार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक शारदा होशिंग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे स्वयंसेवक सिराज शेख, अंबादास गुंजाळ, सोमनाथ बर्डे, अर्चना गुंजाळ, सायली टेकम, ऋतिक बर्डे, मथूरा जाधव, प्रसाद माळी, बाळासाहेब घुंगरे, शोभा दुधवडे, मच्छींद्र दुधवडे, मंगेश थोरात, गोरख धात्रक, मयुरी वनवे, सागर विटकर, तन्वी देशमुख, मनिश राऊत, श्रीकांत शिरसाठ, अविनाश पिंपळे, अजय दळवी, स्वप्नील मधे, राहुल साबळे, पुनम खाडे, निकिता बर्डे व सुरेखा जाधव यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. शेवटी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
