• Sun. Feb 15th, 2026

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संकल्प विजय मेळाव्यात एकवटले युवक

ByMirror

Jan 23, 2024

युवक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

एकीकडे भाजपला पाठिंब्याचे सह्या करता आणि राष्ट्रवादीला विचारधारा विचारता -सुरज चव्हाण (राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष)

अहमदनगर (प्रतिनिधी)- पूर्वी राष्ट्रवादीची पक्षाची विचारधारा शिवसेना व भाजपशी एकमत नव्हती. 2019 मध्ये भाजप-शिवसेना विरोधात निवडणुका लढल्या, मात्र राज्यात वेगळी परिस्थिती उद्भवल्याने राज्याच्या विकासासाठी सत्तेत सहभागी होऊन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजीत पवार यांनी केले आहे. जेंव्हा भाजपला पाठिंबा द्यायचा होता, त्या पत्रावर जितेंद्र आव्हाड व रोहित पवार यांनी सह्या केल्या होते की नाही? याचे उत्तर त्यांनी द्यावे. एकीकडे सह्या करता आणि राष्ट्रवादीला विचारधारा कोणती? यावर प्रश्‍न विचारणाऱ्यांचा राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी समाचार घेतला.


राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या संकल्प विजयाचा युवक मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात चव्हाण बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, जिल्हा उद्योग केंद्राचे बालाजी बिराजदार, युवती सेलच्या अंजली आव्हाड, क्रीडा सेलचे घनश्‍याम सानप, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्‍मा आठरे, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, डॉक्टर सेलचे डॉ. रणजीत सत्रे, युवकचे प्रदेश सरचिटणीस अमर पाटील, सोशल मीडियाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख रणजीत नरोटे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे चव्हाण म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने अजित पवार यांचे राज्यात कार्य सुरू आहे. महापुरुषांच्या विचारांची भूमिका घेऊन पक्ष वाटचाल करत आहे. महिलांना राजकारणात सन्मान व स्थान देण्याचे काम अजित पवार यांनी केले. अजित पवारांचे जवळचे व विश्‍वासू व्यक्तिमत्व म्हणून आमदार संग्राम जगताप यांची ओळख आहे. चोवीस तास जनसेवेमध्ये गुंतलेल्या व सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा आमदार शहराला लाभला आहे. अन्यथा इतर मतदार संघात निवडून आल्यानंतर आमदाराला भेटणे अवघड होते. जगताप यांच्या नेतृत्वाखाली युवा वर्गाची मोठी फळी निर्माण झाली असून, राष्ट्रवादी युवकचे शहरात उत्तम प्रकारे कार्य सुरु आहे. प्रभागातील युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाची ध्येय-धोरण व सुरु असलेले विकासात्मक कार्य जनते पर्यंत घेऊन जावे. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीमागे जनमत उभे करण्यासाठी युवकांनी दिलेली जबाबदारी सक्षमपणे पूर्ण करण्याचे त्यांनी आवाहन केले.


इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, राजकारणात युवक हा महत्त्वाचा घटक आहे. पक्षाला बळ देण्याचे व पुढे घेऊन जाण्याचे कार्य युवक कार्यकर्ते करत असतात. पक्षाच्या दृष्टीकोनाने युवकांवर महत्त्वाची जबाबदारी आहे. युवकांनी पक्ष वाढविण्यासाठी व आमदार संग्राम जगताप यांना भविष्यात मंत्री म्हणून पाहण्याच्या दृष्टीकोनाने कामाला लागण्याची गरज आहे. पक्षाची भूमिका घेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रास्ताविकात राष्ट्रवादी युवकचे प्रवक्ते किरण घुले यांनी युवकच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचा आढावा घेतला.


आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात उपाध्यक्षपदी शेखर गोंधळे, चिटणीसपदी योगेश घोडके, सचिवपदी हर्षल दावभट, चिटणीसपदी अभिजीत खरात, सहसचिवपदी विशाल फुलारी, सोशल मीडिया प्रमुखपदी स्वप्निल कांबळे यांची निवड करुन त्यांना युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. आभार शिवम कराळे व ऋषीकेश जगताप यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी केतन ढवन, आशुतोष पानमळकर, गौरव हरबा, ओंकार म्हसे, कृष्णा शेळके, मंगेश शिंदे, ओंकार मिसाळ, साहिल पवार, कुनाल ससाणे, रोहित सरना, तन्वीर मन्यार, शुभम चितळकर, अभिजीत साठे, सुमित गोहेर, संदीप गवळी, ओंकार साळवे, अरबाज शेख, वैभव ससे, काटे सर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *