आपत्ती व्यवस्थापनात युवकांची भूमिका ठरेल निर्णायक
ऑनलाईन अर्ज करण्याचे नेहरु युवा केंद्राचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या माय भारत या उपक्रमाने देशभरातील युवकांना नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी आवाहन केले आहे. या अभियानाचा उद्देश देशातील तरुणांना राष्ट्रीय आपत्ती, संकट आणि अपात्कालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सज्ज करणे हा असल्याची माहिती नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत नैसर्गिक आपत्ती, अपघात, सार्वजनिक संकट आणि इतर अनपेक्षित घटनांच्या वेळी नागरी प्रशासनास पूरक ठरू शकेल अशी सुप्रशिक्षित आणि सज्ज स्वयंसेवकांची टीम तयार केली जाणार आहे. यामध्ये बचाव कार्य, निर्वासन, प्रथमोपचार सेवा, आपत्कालीन काळजी, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, सार्वजनिक सुरक्षितता, आपत्ती प्रतिसाद आणि पुनर्वसन कार्य यांचा समावेश आहे.
माय भारत या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी होणाऱ्या तरुणांना वास्तविक परिस्थितीत काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच त्यांच्यात नागरिक जबाबदारी, शिस्त आणि देशसेवेची भावना वाढीस लागेल. या उपक्रमात सहभागी होणारे युवक हे केवळ स्वयंसेवक म्हणून कार्य करत नाहीत, तर ते आपत्कालीन काळात जीवन वाचवणाऱ्या महत्त्वाच्या यंत्रणेचा भाग ठरणार आहे.
या अभियानात सर्व उत्साही युवकांनी सहभागी होण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या वतीने खुले आवाहन करण्यात आले आहे. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष यांनी सांगितले की, सध्या निर्माण झालेल्या सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या गरजांमुळे सज्ज नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या माध्यमातून तरुणांनी नेतृत्व घेऊन समाजात सकारात्मक परिवर्तन घडवावे, या मोहिमेचा मुख्य उद्देश त्यांनी सांगितला.
यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक युवकांनी माय भारतच्या https://mybharat.gov.in या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. विद्यमान माय भारत स्वयंसेवकांप्रमाणेच नवीन इच्छुक युवकांनाही यामध्ये सामील होता येणार आहे. या उपक्रमामधून युवकांमध्ये केवळ राष्ट्रीय बांधिलकीच नव्हे, तर जीवनावश्यक कौशल्य, प्रतिकूल परिस्थितीत निर्णयक्षमता आणि सेवाभाव जोपासण्याचे गुण विकसीत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.