यात्रेत शहरासह जिल्ह्यातील युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार -मोहसिम शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहिमेचे प्रारंभ पोस्टर अनावरणाने करण्यात आले. भारत जोडो यात्रा मणिपूर ते मुंबई दरम्यान होत असून, मुंबई येथे होणाऱ्या यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्ह्यातील युवक मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी जनजागृती मोहिम सुरु करण्यात आली असल्याची माहिती युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसिम शेख यांनी दिली.

शहरातील शासकीय विश्रामगृह येथे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारत जोडो न्याय यात्रेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी मोहसिम शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भंडारी, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अकदस शेख, सागर इरमल, राजू शेख, प्रवीण गीते, अज्जू शेख, सोमनाथ कराळे, आशिष घोरपडे, ऋषिकेश थोरात, सामाजिक न्याय विभागचे ब्लॉक अध्यक्ष अक्षय गायकवाड, अमित लोखंडे, तन्वीर शेख, आकाश लोखंडे, आशिष घोरपडे, ऋषिकेश थोरात आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत ओगले म्हणाले की, देशातील नागरिकांना आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याय मिळण्याच्या उद्देशाने भारत जोडो न्याय यात्रा सुरु करण्यात आली आहे. देशभरातील सर्वसामान्य जनता या यात्रेशी जोडली जात असून, युवा वर्ग यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोहसिम शेख यांनी द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी एकता आणि सौहार्दाला समर्थन देण्यासाठी प्रत्येकाने भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची गरज आहे.
युवकांचा रोजगाराचा प्रश्न बिकट असताना श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब बनत चालला आहे. देशात पुन्हा समता, न्याय व बंधुता निर्माणासाठी देशातील नागरिकांना जागृक करण्याच्या उद्देशाने ही यात्रा असल्याचे त्यांनी सांगितले.
