अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे कारवाईसाठी आग्रह
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील महानगरपालिका मधील तत्कालीन नगररचनाकार यांच्या गैरव्यवहाराच्या चौकशीस व कारवाईस विलंब होत असल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने नगर रचना विभाग महाराष्ट्र राज्य (पुणे) यांच्या कार्यालया समोर महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त उपोषण करण्यात आले.
या उपोषणात समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे, धरम पांडा, बंटी मिडगे, गंगाधर कुटे आदी सहभागी झाले होते.
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग अहमदनगर कार्यालयात मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कामे झाली आहे. या प्रकरणी बदली होऊन गेलेला तत्कालीन नगर रचनाकार त्याला जबाबदार असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. क्षेत्र अकृषक करताना, रेखांकन मंजुरी देताना, क्षेत्रधारकांच्या सोयीने ओपन स्पेस व ॲमिनिटी स्पेस सोडणे, प्लॉट धारकांचा कसलाही विचार न करता अंतर्गत रस्ते जोडणे, त्याबरोबर नदी, ओढे, नाले या नैसर्गिक प्रवाहापासूनचे अंतर सोडण्याच्या नियमांना तिलांजली देत क्षेत्रधारकांच्या म्हणण्यानुसार रेखांकन व इतर कामांना मंजुरी देण्याची तक्रारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत.
यासंदर्भात चौकशी करुन तत्कालीन नगर रचनाकार यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी नगर रचना विभाग (पुणे) संचालकांच्या कार्यालया समोर संघटनेच्या वतीने यापूर्वी देखील उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेऊन नगर रचना विभागाचे संचालक वि.दुं. तळपे यांनी तक्रार अर्जाच्या अनुषंगाने नगर रचना सहसंचालक (नाशिक) यांना सात दिवसात अहवाल सादर करण्याचे लेखी पत्र काढले आहे. मात्र अहमदनगर महानगरपालिकेतील नगर रचना विभाग व आयुक्तांनी कारवाई संदर्भात अद्यापि हालचाल केलेली नसून, त्यांच्याकडून अहवाल येण्यास टाळाटाळ होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अहमदनगर महानगरपालिकेतील तत्कालीन नगररचनाकार यांच्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.