• Fri. Mar 14th, 2025

उपोषणाला दहा दिवस उलटून देखील पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका

ByMirror

Feb 7, 2025

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा!; सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी

शिर्डीच्या धर्तीवर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई का करत नाही?

अन्यथा अवैध धंद्यांची हप्तेच्या रेटकार्डसह यादी जाहीर करण्याचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावे व सदर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदलीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने सुरु असलेल्या उपोषणाच्या दहाव्या दिवशी गुरुवारी (दि.6 फेब्रुवारी) उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. शिर्डी येथील दुहेरी हत्याकांड नंतर तातडीने पोलीस निरीक्षकाची बदली करुन अवैध धंद्यावर कारवाई होते, मात्र एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील बोल्हेगाव येथे एकाचा खून झाला असताना व काहींचा खूनाचा प्रयत्न झालेला असताना देखील पोलीस प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याचा प्रश्‍न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.


तर अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास हप्ते देणाऱ्या अवैध धंद्यांचा रेटकार्डसह यादी जाहीर करण्याचा इशारा रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दिला. मागील दहा दिवसापासून उपोषण करत असलेल्या रिपाई महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योतीताई पवार यांची तब्येत खालवली असताना जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषण सोडून हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचे सुचवले आहे. मात्र त्यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करुन सदर पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवणाचा पवित्रा घेतला आहे.


या उपोषणात कावेरी भिंगारदिवे, ज्योती साठे, जयश्री गायकवाड, शितल नाटेकर, सारिका गांगुर्डे, सविता भालेराव, सारिका साळवे, संपदा म्हस्के, दानिश शेख, नईम शेख, संदीप वाघचौरे, विजय शिरसाठ, गुलाम शेख, जमीर सय्यद, जावेद सय्यद, अजीम खान, देवेंद्र वाघमारे, शहाबाज शेख, प्रतीक शिंदे, मुन्ना भिंगारदिवे, विल्सन रूकडीकर, प्रवीण भिंगारदिवे, अकिल शेख, राहुल गाडेकर, दिलनवाज शेख, योधन भालेराव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा, हातभट्टी, मटका, जुगार, बिंगोसह गुन्हेगारी जोमाने सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक झोपेचे सोंग घेत असून, या भागात अवैध धंद्याबरोबरच गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरोडा, लूटमार, चोऱ्या यांसारखे गंभीर गुन्हे सातत्याने घडत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.


सध्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त गांजाची विक्री एमआयडीसी हद्दीत होताना दिसून येत आहे. अनेक युवक गांजाच्या नशेला बळी पडत असून, नशेमध्ये बेभान होऊन त्यांच्याकडून अनेक गंभीर गुन्हे घडत आहे. यामध्ये अनेक अल्पवयीन मुले असून, त्यांचे भवितव्य उध्वस्त होत आहे. हातभट्टी पिऊन अनेक युवक मृत्युमुखी पडले आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. सोरट, बिंगो, जुगार, मटका या अवैध धंद्यावर रोजंदारीवर कमवलेले पैसे युवक गमावत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, काही कुटुंबीय कर्जबाजारी झाले असल्याचे म्हंटले आहे.


या अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनाकडे मागणी करून देखील कारवाई केली जात नाही. अवैध धंदेवाले देखील बिनधास्तपणे पोलिसांना हप्ते चालू असल्याचे उघडपणे बोलत आहे. एक प्रकारे अवैध धंद्यांना पाठबळ देण्याचे काम होत असल्याचा आरोप रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *