• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

गुरु अर्जुन देवजी शहिदी दिनी शहरात भाविकांना प्रसादासह रोपांचे वाटप

ByMirror

Jun 11, 2024
गुरु अर्जुन देवजी शहिदी दिनी शहरात भाविकांना प्रसादासह रोपांचे वाटप

अर्जुन देवजी यांचे हौतात्म्य हे शीख धर्माच्या इतिहासाला कलाटणी देणारे -आ. संग्राम जगताप

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूर येथे गुरु नानक देवजी (जीएनडी) ग्रुपच्या वतीने नागरिकांना प्रसाद, सरबत बरोबर रोपांचे वाटप करुन पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात आला.


प्रसाद, सरबत बरोबरच रोपांचे वितरण करुन भाविकांना पावसाळ्यात घराच्या अंगणामध्ये वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रा. माणिक विधाते, माजी उपमहापौर गणेश भोसले, अजिंक्य बोरकर, जनक आहुजा, संजय आहुजा, राकेश गुप्ता, जय रंगलानी, मनिष खुराना, विकी कंत्रोड, बबलू खोसला, अनिश आहुजा, परभ गुलाटी, सावन छाबरा, किशोर कंत्रोड, राज गुलाटी, शिला तलवार, करन आहुजा, अवतार गुरली, अमन खुराना आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गुरु अर्जुन देवजी अन्यायापुढे न झुकता शहिद झाले. अमानुष छळ सहन करुन धर्माप्रती ते निष्ठावान राहीले. शीख धर्मासाठी शहीद होणारे पहिले गुरू म्हणून ते अजरामर झाले. त्यांचे हौतात्म्य हे शीख धर्माच्या इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. त्यांचे बलिदान आजही समाजासाठी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.


जनक आहुजा म्हणाले की, गुरू अर्जुन देव मानवतेचे खरे सेवक, धर्माचे रक्षक आणि धीर गंभीर स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. ते रात्रंदिवस लोकांची सेवा करत असत. सर्व धर्मांबाबत माहिती आणि आदर असणारे गुरू म्हणूनही ते समाजाला परिचित आहेत.

त्यांचे बलिदान शीख समाजापुढे प्रेरणा म्हणून समोर आले आणि शीख समाजाने कोणत्याही अन्याय, अत्याचारापुढे न झुकता त्याचा सामना केला. सध्या सर्व मानवजातीपुढे पर्यावरणाचा गंभीर प्रश्‍न असून, हा प्रश्‍न वृक्षरोपण व संवर्धनाने सुटणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *