गुन्ह्यातील सर्वच आरोपी मोकाट
14 डिसेंबर पासून पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेल्या बाराबाभळी येथील वाघस्कर कुटुंबातील व्यक्तींना तात्काळ अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आठही आरोपी मोकाट फिरत असून, त्यांना पोलीस प्रशासन पाठिशी घालत असल्याचा आरोप करुन, आरोपींना अटक होण्याच्या मागणीसाठी 14 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दिला आहे.
मित्राला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी बाराबाभळी येथील वाघस्कर कुटुंबातील 8 व्यक्तींवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये (ॲट्रॉसिटीचा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटून गेले आहे, तरी देखील आरोपी अद्याप मोकाटच फिरत आहे. पोलीस प्रशासन गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. सदर गुन्हा फक्त मागासवर्गीय लोकांवर होत असलेल्या जातीय अत्याचार रोखण्यासाठी असून, याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने जिल्ह्यात जातीय अत्याचारात वाढ होत आहे. या प्रकरणात रावसाहेब गणपत वाघस्कर, अशोक मच्छिंद्र वाघस्कर, अजय बबन वाघस्कर, विजय बबन वाघस्कर, सुरेखा विजय वाघस्कर, जालिंदर गणपत वाघस्कर, वैशाली रावसाहेब वाघस्कर, आक्का जालिंदर वाघस्कर (सर्व रा. बाराबाभळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून, त्यांना अटक करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.