मनपा आयुक्तांना निवेदन
जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य, प्रसंगी मनपा प्रशासनाला धारेवर धरणार! – आकाश सोनवणे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गुलमोहर रोड हा वाहतुकीचा गजबजलेला व नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर पथदिवे व गतीरोधक नसल्याने सतत अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस आकाश सोनवणे यांनी केली असून, त्यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
गुलमोहर रोड हा शहरातील सर्वाधिक रहदारी असलेला मार्ग असून, या परिसरात व्यापारी, शैक्षणिक संस्था व निवासी वसाहती मोठ्या प्रमाणावर आहेत. रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने संपूर्ण परिसर अंधारमय होतो. त्यामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यालयातून घरी परतणारे प्रवासी यांना जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
गतीरोधक नसल्यामुळे वाहने सुसाट वेगाने धावत असतात, परिणामी लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहेत.
प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गुलमोहर रोडवर विशेषतः पोलीस चौकीसमोर आणि गरजेच्या ठिकाणी पथदिवे तातडीने बसवावेत, मानांकनानुसार गतीरोधक बसवावेत व त्यावर पांढऱ्या पट्ट्यांचे रंगकाम करून ते स्पष्ट देखील अशी व्यवस्था करावी. या उपायोजनामुळे पदचारी व नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित होईल तसेच वाहतूक शिस्तबद्ध होणार असल्याने यासंदर्भात तातडीने कारवार्इ करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जनतेची सुरक्षा हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. जर मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर आम्ही प्रसंगी प्रशासनाला धारेवर धरू. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही. प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांकडून या समस्येबाबत वारंवार तक्रारी येत असून, रात्री अपघातांची संख्या वाढल्याने नागरिकांचा संयम संपत चालला असून तातडीने सदरचा प्रश्न सोडविण्यात यावा. -आकाश सोनवणे (शहर जिल्हा सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा)
