राज्य सरकारच्या दडपशाहीचा निषेध, फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
मराठा समाज आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाला भाकपचा पाठिंबा
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी (ता.अंबड जि. जालना) याठिकाणी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील व या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शेकडो महिला -पुरुष नागरिकांना अमानुष लाठीमार करत, त्यांच्यावर गोळीबार व अश्रूधूर करत हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केल्याचा आरोप करत सदर घटनेचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. तर या जखमी आंदोलकांची भाकपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी प्रत्यक्ष भेट घेत त्यांची विचारपूस केली.

यावेळी पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, राज्य सहसेक्रेटरी कॉ. प्रा. राम बाहेती, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. राजन क्षीरसागर, राज्य कौंन्सिल सदस्य व अहमदनगर जिल्हा सहसेक्रेटरी कॉ. संजय नांगरे, उस्मानाबाद जिल्हा सचिव उपसरपंच कॉ. पंकज चव्हाण, बीड जिल्हा सेक्रेटरी कॉ. भाऊराव प्रभाळे, कॉ. ज्योतीराम हुरकुडे, कॉ. नितीन रांजवन, कॉ. अंगद ढाकणे, जालना जिल्हा सेक्रेटरी कॉ, प्रल्हाद पडूळ, कॉ. देविदास जिगे, शेवगाव तालुका सेक्रेटरी कॉ. संदीप इथापे, कॉ. वैभव शिंदे, कॉ. रजत लांडे, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष कॉ. प्रसाद गोरे, शेतमजुर युनियनचे औरंगाबाद जिल्हा सेक्रेटरी कॉ. गणेश कसबे यांच्यासह राज्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मराठा समाज आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. तसेच राज्य सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.