खासदार लंके हातात झाडू घेऊन अभियानात सहभागी
राजकारणातील व समाजातील स्वच्छतेसाठी महाविकास आघाडी कटिबध्द -खा. लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात महाविकास आघाडी, खासदार निलेश लंके व बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात खासदार निलेश लंके स्वत: हातात झाडू घेऊन या अभियानात उतरले होते.
बागडपट्टी व सर्जेपूरा परिसराची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे विक्रम राठोड, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, दत्ता कावरे, बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर, उपाध्यक्ष किरण डफळ, कार्याध्यक्ष अजय दराडे, सचिव कुणाल गोसके, खजिनदार वरुन मिस्कीन, अशोक दहिफळे, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, सुरेश म्याना, गोरख धोत्रे, अनिल महांकाळ, गौरव ढोणे, उमेश काळे, मुन्ना भिंगारदिवे, गणेश जिंदम, अमोल डफळ, प्रथमेश संभार, सतिश बल्लाळ, प्रथमेश सिंग आदींसह महाविकास आघाडीचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार निलेश लंके म्हणाले की, स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांची व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे. स्वच्छतेवर नागरिकांचे आरोग्य टिकून आहे. राजकारणातील व समाजातील स्वच्छतेसाठी महाविकास आघाडी कटिबध्द असून, येणाऱ्या काळात पूर्ण शहराची स्वच्छता झाल्याशिवाय थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दिलदारसिंग बीर म्हणाले की, स्वच्छतेला सुरुवात स्वत:च्या घरापासून करण्याची गरज आहे. परिसर स्वच्छ असल्यास रोगराईमुक्त शहर होणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरले असून, यासाठी सर्वांनी स्वच्छता पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. योगीराज गाडे यांनी शहर कचरामुक्त व राजकारणातील घाणमुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी एकजुटीने कार्यकरत आहे. ही स्वच्छता झाल्यास नगरकरांना मोकळा श्वास घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.